स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील ; दानवेंच्या ‘त्या’ विधानाला राऊतांचं प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीचं सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील असा टोलाही त्यांनी लगावला.

राऊत म्हणाले की, “हे सरकार चार वर्ष पूर्ण करेल. एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि चार वर्ष पूर्ण करेल. निराश झाल्यानेच तसंच सर्व प्रयत्न फसल्याने विरोधी पक्षातील नेते असं वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील जनता या सरकारसोबत आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे”. तीन दिवसांचं सरकार जे केलं होतं त्याची आज पुण्यतिथी आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

“तीन दिवसाच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता त्याची आज पुण्यतिथी आहे. आता हे तीन महिन्यात करणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “उद्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य काम करत आहे. तीन पक्षांचं सरकार असूनही भक्कम आहे. देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार महाविकास आघाडीचं आहे,” असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment