शरद पवारांनी आखातीतील मराठी अनिवासी भारतीयांशी साधला संवाद; ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या योजेनवर केली चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आखाती देशांतील अनिवासीय भारतीयांच्या विविध संघटनांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी ऑनलाईन मीटिंगद्वारे संवाद साधला. यावेळी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासी मराठी भारतीयांना लाभ मिळण्यासाठी अनिवासी मराठी भारतीयांची आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांसंबंधी या बैठकीत चर्चा झाली. “नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य व शासन कामकाजात संधी देऊन प्रोत्साहन देते. नवउद्योजकांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिडबीच्या सहयोगाने व्हेन्चर कॅपिटल सुविधाही उपलब्ध आहेत.” असे त्यांनी यावेळी या संघटनांना त्यांना सांगितले.

याबरोबरच अनिवासीय मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ईझ ऑफ डुईंग बिझिनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना (महापरवाना), जागेची सहज उपलब्धता व Land Bank सुविधा, गुंतवणूक रकमेइतका परतावा देणारे आर्थिक प्रोत्साहन, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन योजनांची माहितीही देण्यात आली.

या सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पने प्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचे तसेच [email protected] या ई-मेलद्वारे मैत्री कक्षाशी संपर्क साधता येण्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. आखाती देशांमधून परत आलेल्या अनिवासीय भारतीयांच्या कौशल्याचा व अनुभवाचा कशाप्रकारे उपयोग करून घेता येऊ शकेल, या प्रश्नावर चर्चा करताना, “महाराष्ट्र राज्य औद्यागिक विकासात नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. अनिवासीय भारतीयांना त्यांच्या कौशल्यानुरूप अनेकविध रोजगाराच्या संधी उपलब्ध असून महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासीय भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील.” यावर चर्चा करण्यात आली.

आखाती देशांमधून परत येणाऱ्या अनिवासीय भारतीयांसाठी महाराष्ट्र सरकारच्या महाजॉब्स पोर्टलवर अनिवासीय भारतीयांच्या नोंदणीसाठी काही योजना उपलब्ध असल्याची, या योजनांच्या व्याप्तीबाबतची, कुशल कामगारांच्या एम्प्लॉयमेंट काँट्रॅक्ट्सची पडताळणी, मराठी अनिवासी भारतीयांसाठी एनआरआय सेल याविषयी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. परत येणाऱ्या नागरिकांच्या मुलांचे शिक्षण, अशा नागरिकांच्या मुलांसाठी मराठी भाषा शिकवणी वर्ग जर आखाती देशामधील स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला गेला तर इथे शिकवलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये ग्राह्य धरला जाऊ शकतो का, यासंदर्भातील त्यांच्या शंकेचे निरसन करत त्यासाठी पाठपुरावा करण्याचा शब्द यावेळी पवार यांनी त्यांना दिला.

कोरोना महामारीचा शेती क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, शेती क्षेत्राला आर्थिक चालना व गती देण्यासाठी अनिवासीय भारतीय कशाप्रकारे मदत व सहभाग घेऊ शकतील या प्रश्नासहित शेतीपूरक उद्योग, कोंबडीपालन, दूध व्यवसाय इ. विक्री नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या या परिस्थितीत त्यांच्या शेतमालाच्या सुयोग्य बाजारपेठेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी या बैठकीत मराठी अनिवासी भारतीयांना केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment