असे करा उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन ;A-Z माहिती एका क्लीकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक म्हणुन प्रसिध्दी पावले असुन या पिकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्तरात सुधारणा केली आहे . गेल्या दोन दशकात या पिकाने क्षेत्र आणि उत्पादनात फार मोठी मजल मारलेली आहे . वर्ष २०१ ९ -२० मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास ३७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. सोयाबीनचे ३९ लाख मेट्रीक टन उत्पादन झाले आहे . खरीप २०२० च्या हंगामामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये सोयाबीन काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्यामुळे शारिरीक पक्वतेच्या अवस्थेत बियाणे भिजले . हेच बियाणे जर येत्या खरीप २०२१ च्या हंगामामध्ये पेरणीसाठी वापरल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता आहे . त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःसाठी उन्हाळी सोयाबीनचे बिजोत्पादन घेवून पुढील हंगामाकरिता घरच्याघरी दर्जेदार बिजोत्पादन निर्मिती करावी . त्या करिता खालील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा .

उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनासाठी आवश्यक बाबी

१ ) जमीन : सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे . अत्यंत हलक्या जमीनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही . जास्त आम्लयुक्त , क्षारयुक्त तथा रेताड जमीनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये . जमीनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे

२ ) _हवामान : सोयाबीन हे पीक सुर्यप्रकाशास संवेदनशील आहे . सोयाबीन पीकासाठी समशितोष्ण हवामान अनुकूल असते . त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते . सोयाबीन पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते ; परंतू , कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फूले व शेंगा गळतात . शेंगाची योग्य वाढ होत नाही आकार कमी होतो

३ ) वाण : पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे . पेरणीसाठी वनामकृवि , परभणीने विकसीत केलेल्या एमएयुएस ७१ , एमएयुएस १५८ व एमएयुएस ६१२ या वाणांची किंवा महात्मा फुले कृषि विद्यापीठ , राहुरीने विकसीत केलेल्या केडीएस ७२६ , केडीएस ७५३ या वाणांची किंवा जवाहरलाल नेहरु कृषी विश्वविद्यालय , जबलपूर ने विकसीत केलेल्या जेएस ३३५ , जेएस ९३-०५ , जेएस २०-२९ , जेएस २०-६९ , जेएस २०-११६ या वाणांची निवड करावी .

वरील वाण जर शेतकरी बंधूंनी खरीप २०२० मध्ये पेरलेले असतील व त्या बियाण्याची उगवणशक्ती चांगली असेल तर घरचे बियाणे स्वच्छ करुन बिज प्रक्रिया करुन पेरणी करावी .

४ ) जमीनीची पूर्व मशागत : खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर नांगरणी करुन विरुध्द दिशेने मोगडणी करावी व नंतर पाटा मारुन जमीन समतोल करावी .

५ ) बिजप्रक्रिया , पेरणी , खते व आंतरमशागत : बिजप्रक्रिया: सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते . रोग आल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बिन प्रक्रिया केल्यास रोगाचे व्यवस्थापन व्यवस्थीतरित्या होते . सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी मिश्न उत्पादन कार्बोक्झीन ३७.५ % + थायरम ३७.५ % ची ( व्यापारी नाव – व्हिटावॅक्स पॉवर ) ३ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ . बिज प्रक्रिया करावी .

बीज प्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट , चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते . या शिवाय बिजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ( ८-१० ग्रॅम / कि.ग्रॅ . बियाणे ) चा वापर सुध्दा करावा . या बुरशी नाशकांच्या बिज प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम ) + स्फुरद विरघळणारे जिवाणू खताची ( पीएसबी ) २५० ग्रॅम प्रति १० कि.ग्रॅ . किंवा १०० मिली / १० कि.ग्रॅ . ( द्रवरुप असेल तर ) याची बिजप्रक्रिया करावी .

पेरणी : पेरणीची वेळ : उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बिजोत्पादनाकरिता डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्या पर्यंत पिकाची पेरणी करावी . जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलोऱ्यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो . त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते . जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान १० अंश सेल्सीअसच्या खाली गेले असेल तर पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणत : १५ अंश झाल्यास पेरणी करावी . कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागतात . लागवडीचे अंतर व पध्दत : सोयाबीनची पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर व २.५ ते ३.० सें.मी. खोलीवर करावी . पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही . बियाण्याचे प्रमाण : सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी ६५ कि.ग्रॅ . बियाणे वापरावे ( एकरी २६ किलो ) .

खते : शेणखत / कंपोस्ट खत : सोयाबीनसाठी हेक्टरी २० गाड्या ( ५ टन ) शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून जमिनीत चांगले मिसळावे .

रासायनिक खते : सोयाबीनला हेक्टरी ३० कि.ग्रॅ.नत्र + ६० कि.ग्रॅ . स्फुरद + ३० कि.ग्रॅ . पालाश + २० कि.ग्रॅ . गंधक पेरणीच्या वेळेसच द्यावे . पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाहो . याची काळजी घ्यावी . गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे . त्याच प्रमाणे हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० कि.ग्रॅ . बोरॅक्स द्यावे . या पिकास नत्र , स्फुरद , पालाश , मॅग्नेशिअम , गंधक , कॅल्शियम , मॉलिब्डेनम , बोरॉन , लोह , जस्त व मँगनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी , फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात .

उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या व ५५ व्या दिवशी १०० ग्रॅम पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी . पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा तसेच माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी . पिक २० ते २५ दिवसाचे असतांना जर सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास मायक्रोला ( ग्रेड -२ ) या सुक्ष्मअन्नद्रव्यांची ५० ते ७५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी . पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतांना १ ९ : १ ९ : १ ९ या लिक्विड रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना ०:५२:३४ या लिक्विड रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर १० लिटर

पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी . रासायनिक खते देण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करता येईल . आंतरमशागत : पिक २० ते ३५ दिवसाचे असतांना दोन कोळपण्या ( १५ ते २० दिवस पहिली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी ) व एक निंदणी करुन शेत तणविरहित ठेवावे . एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करु नये अन्यथा सोयाबीनच्या मुळा तुटून नुकसान होते .

पाण्याचे नियोजन : पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी . थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत : उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागू शकतात . चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे . जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे . सोयाबीनमध्ये रोप , फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याचा ताणास संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे . ज्या शेतात बिजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी . पिक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणत : जमीनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० पाणी पाळ्याची आवश्यकता आहे . भेसळ काढणे : सोयाबीन पिकामध्ये झाडांची उंची , पानांचा आकार , झाडावरील लव , पान , खोड व फुलांचा रंग इत्यादी लक्षणांनुसार भेसळ ओळखून नष्ट करावी .

पीक संरक्षण : उन्हाळी सोयाबीन पिकावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी , घाटेअळी , वाटाण्यावरील शेंगा पोखरणारी अळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे इ . किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते . सदर किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५० ईसी ( २० मिली ) किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन ४.९ सी.एस. ( ६ मिली ) किंवा थायमिथोक्झाम १२.६० % + लँबडा सायहॅलोथ्रीन ९ .५ % झेडसी ( २.५ मिली ) किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५ एस सी ( ३ मिली ) या किटकनाशकांचा वापर करावा . सदर किटकनाशकांचे प्रमाण हे १० लीटर पाणी ( साधा पंप ) यासाठी असून पॉवर स्प्रे साठी किटकनाशकाची मात्रा तीनपट करावी . उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही ; परंतु , येलो व्हेन मोझेक ‘ या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते . प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून नष्ट करावी . पांढऱ्यामाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो . त्यामुळे पांढयमाशीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे . त्यासाठी थायमिथोक्झाम १२.६० % + लँबडा सायहॅलोथ्रीन ९ .५ % झेडसी ( २.५ मिली / १० लीटर पाणी ( साधा पंप ) या किटकनाशकाचा वापर करावा .

काढणी व मळणी :

शेंगा पिवळ्या पडून पक्व होताच पीकाची काढणी करावी . कापणी नंतर पिकाचे छोटे छोटे ढीग करुन २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून मळणी यंत्राची गती कमी करुन मळणी करावी व बियाण्याच्या बाह्य आवरणाला ईजा पोहचणार नाही याकडे लक्ष द्यावे . मळणी करतांना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती ४०० ते ५०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के पर्यंत असेल तर गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी . साधारणत : उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाण्याचा रंग पिवळसर हिरवट असतो .

साठवण : मळणी नंतर बियाणे ताडपत्री / सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरुन बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्के पर्यंत आणावे . बियाणे स्वच्छ करुन पोत्यात भरुन साठवण करावी . साठवणीचे ठिकाण थंड , ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे . साठवण करतांना एकावर एक चार पेक्षा जास्त पोती ठेवू नये .
उत्पादन : उन्हाळी सोयाबीनचे एकरी ३ ते ५ क्विंटल पर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते .

टिप : उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामासारखे होत नाही . दाण्याचा आकार लहान असतो . १०० दाण्याचे वजन ८ ते १० ग्रॅम असते . उन्हाळी सोयाबीनचा हंगाम फक्त घरच्याघरी बिजोत्पादन करण्यासाठी चांगला आहे . खरीप २०२० मध्ये सोयाबीन काढणीच्यावेळेस आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात भिजलेले असल्यामुळे अशा बियाण्याची उगवणक्षमता कमी होण्याची शक्यता आहे . त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे . अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन घेण्यास हरकत नाही .

लेखक : १ ) डॉ . एस.पी. म्हेत्रे प्रभारी अधिकारी , सोयाबीन संशोधन योजना , वनामकृवि , परभणी . मो . क्र . – ७५८८१५६२१० . २ ) डॉ . आर . एस . जाधव- सहाय्यक प्राध्यापक ( किटकशास्त्र ) , सोयाबीन संशोधन योजना , वनामकृवि , परभणी . ३ ) श्री व्ही . आर . घुगे – सहाय्यक प्राध्यापक , सोयाबीन संशोधन योजना , वनामकृवि , परभणी . मो.क्र . – ७५८८१५६२१३ .

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment