सामनातून मोदी सरकारची तुलना मुघलांशी; देशात लोकशाहीचा खूनखराबा सुरू असल्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यांनतर त्यांचा नवी दिल्ली येथील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा? राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही काढून घेतले. हा आसुरी आनंद ज्यांना आज झाला आहे, त्यांना भविष्यात कर्माची फळे भोगावी लागतील. इतक्या खुनशीपणाने कदाचित मोगलांनीही राज्य केले नसेल असं म्हणत सामनातून मोदी सरकारची तुलना मुघलांशी करण्यात आली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

एका मानहानी खटल्यात राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द व्हावी म्हणून त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली व आता लगेच चोवीस तासांत सरकारने श्री. गांधी यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली आहे. एखाद्यात अतिआत्मविश्वास असू शकतो, पण हा इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा, हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे. इंग्रजांचे जुलमी सरकार भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वीर सावरकर अशा क्रांतिकारकांशी ज्या निर्घृण पद्धतीने वागले, त्याच निर्घृण रीतीने मोदीचे सरकार आपल्या राजकीय विरोधकांशी वागत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही काढून घेतले. हा आसुरी आनंद ज्यांना आज झाला आहे, त्यांना भविष्यात कर्माची फळे भोगावी लागतील हे नक्कीच… इतक्या खुनशीपणाने आपल्या देशात कदाचित मोगलांनीही राज्य केले नसावे.

गौतम अदानी यांनी विद्यमान सत्तापाऱ्यांच्या मदतीने देश लुटला हे आता उघड झाले आहे. त्याच्या कोणत्याही संपतीवर जप्ती आली नाही. राहुल गांधी यांनी ज्या सर्व ‘मोदी’चा नामोल्लेख करून त्याच्या चौर्यकथांचा पर्दाफाश केला. त्यांची घरे शाबूत आहेत, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांची खासदारकी व घरही आता काढून घेण्यात आले. दशाची लोकशाही किती कठीण कालखंडातून जात आहे त्यांचे हे उचलत उदाहरण आहे. अदानी यानी एलआयसी, स्टेट बँकेचे पैसे उडवलेच पण कष्टकऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे कर्मचारी भविष्य निधीचे पैसेही मोदी सरकारने अदानीच्या खात्यात वळवून हाहाकार माजवला आहे. हा जनतेचा पैसा आहे. या लुटीच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांचा छळ केला जात आहे.

देशात अभूतपूर्व अशी अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी किंवा घर काढून घेतले हा तर प्रश्न आहेच, पण त्याचवेळी देशात लोकशाहीचा जो खूनखराबा सुरू आहे तो चितेचा विषय आहे. अर्थात हिंदुस्थान म्हणजे पाकिस्तान नाही व पाकिस्तानप्रमाणे येथे विरोधकांना गुमानपणे चिरडता येणार नाही. इस्त्राईलच्या जनतेसारखी इथली जनतादेखील लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. इस्त्राईलच्या जनतेने संपूर्ण देशात एक आदर्श निर्माण केला. जेव्हा एक हुकूमशहा लोकशाहीला उखडून फेकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतो, न्यायालये खिशात ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात व मोदींचे मित्र, इसायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना पळून जावे लागते. उद्या कदाचित हेच नेत्यानाहू आपले मित्र मोदी यांच्याकडे राजकीय आश्रय मागतील व मोदी त्याना दिल्लीतील एखादा बंगला बहाल करून कर्तव्यास जागतील, पण राहुल गांधीना मात्र बेघर करतील, नव्हे केलेच आहे. इसायल देशात जे घडते आहे. त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यानी धडा घ्यावा नाहीतर तुमचाही देश त्याच दिशेने निघाला आहे असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.