हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज महायुती सरकारकडून (Mahayuti Government) राजाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्यासह विविध क्षेत्रांसाठी सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा देखील समावेश आहे. त्यांनी, पत्रकार परिषदेत सरकारचा जाहीरनामा दाखवत त्यांना केलेल्या घोषणांची आठवण करून दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की गेल्या 10 हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल. निवडणूक काळात वारेमाप जाहीराती केल्या होत्या. थापा मारायचे थांबणार नाही असे घोषवाक्य हवे. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी.
मी शेतक-यांना कर्जमुक्त केले
त्याचबरोबर, लाडक्या बहिणींना 2100 दिले का? शेतक-यांना कर्जमुक्त केले का? असा सवाल ही त्यांनी सरकारला विचारला आहे. पुढे बोलताना, स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. मी शेतक-यांना कर्जमुक्त केले होते. वीजबिलात 30 टक्के कपात केली का? असेही त्यांनी पुढे विचारले. यासह कंत्राटदारांसाठी 64 हजार कोटींची कामे मुंबईत होणार आहेत. दोन विमानतळे जोडण्याचे काम हे अदानींचे असेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत, 2024 च्या जुलैपासून सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना आर्थिक लाभ दिले जाणार आहेत. यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च होणार आहे. आता सरकारकडून 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी (Maharashtra Budget 2025) प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेचे पुढे नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.