केरळ । Norovirus या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला उलट्या आणि जुलाबाची समस्या जाणवते, मात्र ती व्यक्ती काही दिवसांत बरी होते. साधारणपणे, या विषाणूच्या संसर्गाची बहुतेक प्रकरणे हिवाळ्यात दिसून येतात. हा एक विषाणू आहे जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो.
अशा प्रकारे पसरतो ‘हा’ विषाणू
Norovirus सामान्यतः दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. अशा परिस्थितीत केरळ सरकार पाण्याच्या शुद्धीकरणासाठी त्यात जास्त क्लोरीन मिसळत आहे. सहसा हा संसर्ग जीवघेणा नसतो, परंतु मुले आणि वृद्धांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. संसर्ग, अति उलट्या आणि जुलाबामुळे त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते.
Norovirus संसर्ग आणि त्यावरील उपचार म्हणजे काय ?
या विषाणूशी लढण्यासाठी रुग्णाला कोणतेही विशेष औषध दिले जात नाही. केरळच्या आरोग्य मंत्रालयाने त्याच्या उपचारासाठी प्रोटोकॉल जारी केला आहे. यानुसार Norovirus ची लागण झालेल्या व्यक्तीने घरीच विश्रांती घ्यावी. उकळलेले आणि ORS मिसळलेले पाणी प्यावे. लोकांनी अन्न खाण्यापूर्वी आणि शौचास गेल्यावर आपले हात साबणाने चांगले धुवावेत. जी लोकं सामान्यतः प्राण्यांच्या संपर्कात असतात त्यांनी विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
पहिल्यांदा अमेरिकेत सापडला होता ‘हा’ विषाणू
Norovirus हा एक छोटासा विषाणू आहे. संक्रमित वस्तू गिळल्याने ते मानवी शरीरात पोहोचते. या विषाणूचा उगम अमेरिकेतून झाला आहे. अमेरिकेत या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे खूप जास्त आहेत, मात्र ते प्राणघातक मानले जात नाही. बहुतेक वेळा या विषाणूचा प्रसार रेस्टॉरंट्स इत्यादींमधून होतो.
भारतात आढळून आलेली प्रकरणे
केरळमधील वायनाड जिल्ह्यात Norovirus च्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. यानंतर, केरळ सरकारने सांगितले की,’लोकांना या संसर्गजन्य विषाणूपासून सावध राहण्याची गरज आहे. त्याच्या संसर्गामुळे पीडितेला उलट्या आणि जुलाब सुरू होतात.’ दोन आठवड्यांपूर्वी वायनाड जिल्ह्यातील विथिरीजवळील पुकोडे येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे 13 विद्यार्थ्यांना दुर्मिळ Norovirus संसर्गाची नोंद झाली होती.
परिस्थिती नियंत्रणात आहे
आरोग्य अधिकार्यांनी सांगितले की,’परिस्थिती नियंत्रणात आली असून व्हायरसचा आणखी प्रसार झाल्याची बातमी नाही.” ते म्हणाले की,”प्रतिबंधात्मक उपायांचा एक भाग म्हणून जनजागृती वर्ग आयोजित करण्याबरोबरच ते पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माहितीचे संकलनही तयार करत आहेत.” पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,”कॅम्पसच्या बाहेर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग पहिल्यांदा आढळला होता.”
राज्य सरकारने तातडीने पावले उचलली
आरोग्य अधिकार्यांनी त्वरीत नमुने गोळा केले आणि ते अलाप्पुझा येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मध्ये तपासणीसाठी पाठवले. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यांनी वायनाडमधील परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्र्यांनी अधिका-यांना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपक्रम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले. सध्या काळजी करण्यासारखे काहीही नसून सर्वांनी सावध राहावे, असे सांगण्यात आले आहे.
पिण्याच्या पाण्याची स्वच्छता आवश्यक आहे
या आजाराशी लढण्यासाठी केरळ सरकार ‘सुपर क्लोरीनेशन’सह प्रतिबंधात्मक उपक्रम हाती घेत आहे. सुपरक्लोरीनेशन ही एक जलशुद्धीकरण प्रक्रिया आहे ज्यामध्ये पाणीपुरवठ्यात जास्त क्लोरीन मिसळल्याने रासायनिक अभिक्रियांना गती मिळते किंवा थोड्या कालावधीतच निर्जंतुकीकरण होते. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ असले पाहिजेत आणि योग्य प्रतिबंध आणि उपचाराने हा आजार लवकर बरा होऊ शकतो.