Confirm Ticket : रेल्वेच्या कन्फर्म तिकिटासाठी आपत्कालीन कोट्याचा गैरवापर आता थांबणार आहे. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, ट्रॅव्हल एजंटकडून येणाऱ्या कोणत्याही तिकीट विनंतीला आता मान्यता दिली जाणार नाही. हे पाऊल मंत्रालयाने कोट्याच्या (Confirm Ticket) दुरुपयोगाच्या सततच्या तक्रारींनंतर उचलले आहे.
मंत्रालयाचे स्पष्ट निर्देश (Confirm Ticket)
रेल्वेच्या सर्व १७ विभागीय मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आले आहे की, “ट्रॅव्हल एजंटकडून आपत्कालीन कोट्यातून आरक्षणासाठी वारंवार विनंत्या केल्या जात आहेत. हे नियमांच्या पूर्णपणे विरोधात आहे.”
कोणते नियम असतील लागू?
- २०११ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.
- प्रत्येक विनंती अधिकृत राजपत्रित अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीनिशी असावी.
- त्यात अधिकारी व प्रवाश्याची संपूर्ण माहिती – नाव, पद, फोन नंबर, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- प्रत्येक विभागाला प्रवासाचा तपशील आणि विनंतीचा स्त्रोत नमूद करत रजिस्टर ठेवावा लागेल.
- प्रत्येक विनंतीला डायरी क्रमांक देणे बंधनकारक असेल.
गंभीर निरीक्षणाचे आदेश
रेल्वेने PRS (प्रवासी आरक्षण केंद्र) वर वेळोवेळी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. टाउट्स (तिकीट दलाल) व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संगनमतावर निर्बंध आणण्याचा हा प्रयत्न आहे.
महत्त्वाची सूचना
- “V.V. IMPT”, “MUST”, किंवा “ADJUST” असे शब्द वापरणाऱ्या स्लिप्सची पुन्हा पडताळणी केली जाईल.
- संशयास्पद विनंती असल्यास संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधून खात्री केली जाईल.
- सर्व विनंती स्लिप्स किमान तीन महिने जतन करून ठेवणे आवश्यक असेल.
- कोणीही रिकाम्या स्लिप्सवर स्वाक्षरी करून कर्मचाऱ्यांना देऊ शकत नाही.
आता गरजूंनाच अधिकृत मार्गाने आपत्कालीन कोट्यातून कन्फर्म तिकीट (Confirm Ticket) मिळेल. दलाली व फसवणुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचे हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे गरजूंना अधिक पारदर्शक आणि निःपक्षपाती पद्धतीने तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे दलालांची भूमिका कमी होऊन, सामान्य प्रवाशांना सुलभता लाभणार आहे.