Fateh Missile II : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या मोठी तणावाची परिस्थिती निर्मण झाली असून भारताकडून सुरु केलेल्या ऑपरेशन सिंदुरचे उत्तर म्हणून पाकिस्तान सतत सीमेवरील राज्यावर हल्ला करतो आहे. सीमारेषेच्या पलीकडून पाकड्यांचा हल्ला सुरूच आहे. अशातच राजधानी दिल्ली उध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा नेस्तनाबूत झाला आहे. पाकिस्तानने आपल्या ‘फतेह-II’ या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रावर जो गर्व केला होता, तो भारताने अक्षरशः चुरडून टाकला आहे. पाकिस्तानकडून भारतावर मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र भारतीय वायुदलाच्या सतर्कतेमुळे हे क्षेपणास्त्र हवेतच निष्क्रीय करण्यात आले.
गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या पश्चिम भागातील एका महत्त्वाच्या राजकीय लक्ष्यावर ‘फतेह-II’ क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रिपोर्ट्सनुसार, हे क्षेपणास्त्र थेट भारताची राजधानी दिल्लीच्या दिशेने डागण्यात आले होते. मात्र हरियाणामधील सिरसा येथे तैनात ‘बराक-8’ एअर डिफेन्स सिस्टमने या मिसाइलला हवेतच निष्क्रीय केलं.
पाकिस्तानच्या फतेह-II क्षेपणास्त्राची माहिती (Fateh Missile II)
फतेह-II ही पाकिस्तानची लघु पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाइल असून तिची जास्तीत जास्त मारक क्षमता सुमारे 400 किमी आहे. या मिसाइलमध्ये जडत्वीय आणि उपग्रह नेव्हिगेशन प्रणालींचा समावेश असून ती अचूक लक्ष्य साधण्यात सक्षम आहे. रिपोर्टनुसार, तिची त्रुटी मर्यादा फक्त 10 मीटरपेक्षा कमी आहे. 365 किलो वजनाच्या युद्धसज्ज वॉरहेडला वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये ड्युअल थ्रस्ट सॉलिड रॉकेट मोटरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही मिसाइल सुपरसोनिक वेगाने मार्गक्रमण करते.
मोबाईल लाँचरवरून डागली जाणारी ही मिसाइल पाकिस्तानच्या मते त्यांची एक रणनीतिक संपत्ती आहे. मात्र भारताने ती वेळेत निष्क्रीय करून पाकिस्तानच्या सर्व योजना उद्ध्वस्त केल्या.
पाकिस्तानचा कुरापतीपणा थांबेना
ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरला आहे. त्यानंतर सातत्याने तो भारतातील विविध भागांमध्ये ड्रोन हल्ल्यांचे अपयशी प्रयत्न करत आहे. शुक्रवारी (9 मे) देखील काश्मीरपासून गुजरातमधील भुज आणि राजस्थानमधील जैसलमेरपर्यंत तब्बल 26 ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. मात्र भारतीय सुरक्षादलांनी हे सर्व हल्ले वेळेत हाणून पाडले.
फतेह-II सारख्या मिसाइलचा हवेतच नायनाट केल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले की भारताच्या सुरक्षा यंत्रणा उच्चतम पातळीवर सज्ज असून कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा घुसखोरी भारत सहन करणार नाही.