History Of Pune : औरंगजेबाने बदललं होतं पुण्याचं नाव; छ. शिवरायांच्या निधनानंतर किल्ल्यांच्याही नावात केला होता बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pune) पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाय पुण्याची खाद्य संस्कृती, पुरातन वास्तू जगभरात प्रसिद्द आहेत. तसेच पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. इथे मैलो दूर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. आज जगाच्या नकाशात पुण्याची स्वतंत्र ओळख आहे. पुण्यात मराठ्यांचे वास्तव्य आणि त्याच्या खुणांचे दाखले आजही आहेत. पुण्यात स्थित असलेला शनिवारवाडा अनेक घटनांचा साक्षीदार आहे. अशाप्रकारे पुण्याचा इतिहासाशी अत्यंत घनिष्ट संबंध आहे.

पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? पुणे शहराचा जसा इतिहास आहे तसाच पुण्याच्या नावामागे देखील मोठा इतिहास आहे. फार क्वचित लोकांना माहित असेल की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने पुण्याला एक विशेष नाव दिले होते. याविषयी तुम्हाला माहित नसेल तर चला लगेच जाणून घेऊया. (History Of Pune)

ताम्रपटात उल्लेख

इतिहासानुसार इ.स. ७५८ सालच्या ताम्रपटात पुणे शहराचा सर्वांत पहिला लिखित स्वरूपातील उल्लेख मिळतो. या ताम्रपटात पुण्यासह मुळा नदी, दापोडी, भोसरी, बोपखेल या ठिकाणांचा देखील विशेष स्वरूपात उल्लेख केल्याचे दिसून येते. याशिवाय इ.स. ७६८ च्या ताम्रपटात पुण्याबाबत आणखी एक उल्लेख सापडतो. (History Of Pune) पुढे इ.स. ९९३ सालच्या ताम्रपटात पुण्याचा ‘पूणक’ म्हणून उल्लेख केल्याचे दिसून येते.

इतिहास संशोधकांनी सादर केलेल्या पुरावे आणि त्यावर केलेल्या अभ्यासानुसार, चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुणे शहराचे एकूण ५ भाग करण्यात आले होते. ज्यामध्ये माळीची जमीन, मुजेरीची जमीन, कुंभारी आणि कासारी या कारागीरांच्या एकूण २ वस्त्या आणि पुणेवाडीची १ वस्ती असे पाच भाग विभागण्यात आले होते. यापुढील काळात पुण्याचा ‘कसबे पुणे’ असा उल्लेख सापडतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर…

त्या काळात मुघलांच्या जुलमाने उध्वस्त झालेले पुणे स्वतः राजमाता जिजाऊ यांनी पुन्हा वसवले होते. त्यावेळी पुण्यातील कसबा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि मराठ्यांवर दुःखाच्या डोंगरासह औरंगजेब नावाचे संकट चालून आले. (History Of Pune) मराठ्यांना हरवून संपूर्ण दक्षिण भारत काबीज करायचा मानस घेऊन औरंगजेब बादशाह स्वतः महाराष्ट्रात आला. दरम्यान, औरंगजेब महाराष्ट्रात आल्यानंतरच्या काळात पुण्याचा आणखी एक विशेष आणि वेगळा उल्लेख मिळतो.

मुघल सम्राट औरंगजेबाची दक्षिण काबीज करण्याची मोहीम अनेक वर्षे सुरु होती मात्र मराठ्यांच्या झुंझार लढयापुढे औरंगजेब टिकू शकला नाही. (History Of Pune) त्याला अपयश पत्करावे लागले. या मोहिमेदरम्यान औरंगजेबाच्या आयुष्यातील शेवटचे क्षण जवळ आले. यावेळी १७०२- ०३ मध्ये तो पुण्यातच तळ ठोकून राहिला. आपली छावणी आणि मुक्काम त्याने नागझरी ओढ्यापलीकडे भवानी पेठेजवळ बोरवनात केल्याचे सांगितले जाते. या भागात बोरीची झाडे असल्याने त्याला ‘बोरवन’ अशी ओळख मिळाली होती.

औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव (History Of Pune)

औरंगजेबाने इ.स. १७०२- ०३ दरम्यानच्या काळात पुण्याचे नाव बदलल्याचा उल्लेख सापडतो. याचे कारणदेखील येथे नमूद करण्यात आले आहे. औरंगजेबाचा नातू ‘मुही- उल- मिलत’ हा पुण्यात वारला आणि त्याची कबर कुंभार वेशीजवळ धाकट्या शेख सल्ल्यानजीक बांधण्यात आली. औरंगजेबाने आपल्या नातवाच्या स्मरणार्थ त्याकाळी पुण्याला ‘मुहियाबाद’ असे नाव दिले होते. इतकेच नव्हे तर कालांतराने या ठिकाणी त्याने महियाबाद नावाची एक पेठदेखील वसवली. यामुळे पुण्याचे तत्कालीन उल्लेख महियावाद- पुणे असेदेखील सापडतात.

किल्यांची सुद्धा नावं बदलली

असे सांगितले जाते की, धाकट्या शेख सल्ल्याच्या जागी पूर्वी पुण्येश्वर मंदिर होते. (History Of Pune) तर नव्या पुलाजवळ थोरल्या शेख सल्ल्याच्या जागी नारायणेश्वर मंदिर होते. औरंगजेबाने पुण्याला ‘मुहियाबाद’ नाव तर दिले पण हे नाव फार काळ टिकले नाही. इतकेच काय तर त्याने किल्ल्यांची देखील नावे बदलली होती. रायगडचे इस्लामगड, सिंहगडचे बक्षिंदाबक्ष, सज्जनगडचे नवरसतारा आणि साताऱ्यातील अजिंक्यताऱ्याचे आजमतारा, तोरण्याचे फत्तेहुलगैब अशी नावे केली होती. मात्र, पुण्याच्या ‘मुहियाबाद’ नावासारखीच गडांची बदललेली ही नावेदेखील फार काळ टिकू शकली नाहीत.