देशातील महामार्गांवरील टोल वसुलीच्या पद्धतीत मोठा बदल घडणार आहे. FASTag युग संपुष्टात येणार असून, त्याऐवजी GPS आधारित नव्या प्रणालीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात मोठा इशारा दिला आहे.
नवीन टोल प्रणाली 15 दिवसांत लागू होणार?
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “केंद्र सरकार 15 दिवसांत नवीन टोल धोरण आणणार आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर कोणालाही टोलविषयी तक्रार करण्याची गरज भासणार नाही.”
कशी काम करेल नवीन GPS आधारित टोल प्रणाली?
या प्रणालीअंतर्गत वाहनांमध्ये OBU (On-Board Unit) नावाचे डिव्हाईस बसवले जाईल, जे GNSS (Global Navigation Satellite System) तंत्रज्ञानावर आधारित असेल. वाहन किती किलोमीटर प्रवास करते, हे डिव्हाईस ट्रॅक करेल. त्या आधारावरच टोल शुल्क थेट बँक खात्यातून किंवा डिजिटल वॉलेटमधून आपोआप वजा होईल. त्यामुळे टोल प्लाझावर गाड्यांना थांबण्याची गरज भासणार नाही.
सुरुवातीला ही प्रणाली ट्रक, बस आणि इतर मोठ्या वाहनांवर लागू केली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व खासगी वाहनांवर देखील ती लागू होणार आहे.
ही प्रणाली NavIC (Navigation with Indian Constellation) या भारताच्या स्वतःच्या सॅटेलाइटवर आधारित असेल. यामुळे डेटा देशांतर्गत सुरक्षित राहील आणि गोपनीयतेचा भंग होणार नाही.
FASTag ते GPS – एक प्रवास
2016 मध्ये FASTag प्रणाली सुरू झाली. यामध्ये RFID (Radio Frequency Identification) वापरून वाहनाच्या काचेला लावलेला टॅग स्कॅन केला जातो आणि टोल शुल्क वसूल केले जाते. मात्र, वाढलेली गर्दी, तांत्रिक अडचणी, टॅगचा गैरवापर, या त्रुटींमुळे आता सरकार अधिक अचूक, पारदर्शक आणि जलद प्रणालीकडे वळत आहे.
1 मेपासून नवीन टोल प्रणाली लागू होण्याची शक्यता आहे. GPS आधारित ही प्रणाली भारतीय टोल व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणू शकते. आता ‘थांब-टोल-चुकवा’चा जमाना संपतोय आणि ‘चालत जा, टोल आपोआप कटेल’ अशा युगाची सुरुवात होणार आहे.