Pahalgam Terrorist Attack : दहशतवाद्यांच्या गोळीबारात 28 जणांच्या मृत्यूची भीती; महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा देश हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात 28 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचाही समावेश असून, काही जखमी पर्यटक पुणे आणि मुंबई येथील आहेत.

सूत्रांनुसार, दहशतवाद्यांनी (Pahalgam Terrorist Attack) पर्यटकांवर तब्बल 50 हून अधिक राउंड गोळीबार केला. 10 दहशतवाद्यांचा सहभाग या हल्ल्यात होता, यातील सहा स्थानिक तर चार विदेशी होते. हा हल्ला पाकिस्तानप्रेरित कटाचा भाग असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या बंदी घातलेल्या संघटनांचा या कटात सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरला रवाना झाले असून, पंतप्रधान मोदींनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात असून, त्यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांच्याशी संपर्क साधला आहे.

मृतांमध्ये दिलीप डिसले आणि अतुल मोने (महाराष्ट्र) यांचा समावेश असल्याचं कळतं आहे. जखमींपैकी एक पनवेलमधील असून, दुसऱ्याचे ठिकाण शोधले जात आहे. जखमींमध्ये माणिक पटेल (पनवेल) आणि एस. भालचंद्रराव यांचा समावेश असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

हल्ल्याचा हेतू अमरनाथ यात्रेपूर्वी (Pahalgam Terrorist Attack) पर्यटक आणि यात्रेकरूंमध्ये भीती निर्माण करणे हा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सोनमर्गमध्येही तत्सम हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या मते, टीआरएफचा “फाल्कन स्क्वॉड” हाच हल्ल्याच्या मागे असून, त्यांनी अलीकडेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची मागणी व वापर सुरू केल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) या हल्ल्याचा तपास करणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सोनमर्गला (Pahalgam Terrorist Attack) भेट दिली असून, ते लवकरच पहलगामलाही पोहोचणार आहेत. दहशतवाद्यांनी आधी काही दिवस रेकी केली आणि नंतर योग्य संधी साधून हल्ला केल्याचंही स्पष्ट झालं आहे.