हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत निर्णायक पावलं उचलली आहेत. भारताने 1960 चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात चारही आघाड्यांवर भारताने कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने कारवाईची मोहीम उघडली असून, पहलगाम अन आजूबाजूच्या परिसरात सुमारे 1500 हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांचा समावेश आहे.
सिंधू करारावरील स्थगिती कायम (Pahalgam Terrorist Attack) –
केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले असून, त्यानुसार पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, पाकिस्तान दहशतवादाला थारा देत असतानाच भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, तोपर्यंत सिंधू करारावरील स्थगिती कायम राहील. हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी जंगलांनी वेढलेल्या परिसरात दहशतवादी कसे पोहोचले, अन हल्ल्यानंतर कुठल्या मार्गाने पळाले असावेत, यासंबंधी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आहे. सध्या त्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
कोणालाही सोडले जाणार नाही –
देशभरातून या हल्ल्याच्या (Pahalgam Terrorist Attack) निषेधार्थ संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, “धर्माच्या आधारे पर्यटकांची हत्या करणं हे निंदनीय आहे. निर्दोषांच्या हत्येचं प्रत्युत्तर जशास तसे दिले जाईल,” असे ठाम शब्दांत सांगितले आहे.




