आघाडी सरकराचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प . भारताची ही पहिली बुलेट ट्रेन असून याचे काम वेगाने सुरु आहे. शिवाय सर्वसामान्यांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता आहे. याविषयी एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात बुलेट ट्रेन प्रकल्पाची सद्यस्थिती उलगडत महत्त्वाची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य
एका कार्यक्रमामध्ये बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, “गुजरात राज्याने बुलेट ट्रेनच्या कामात आघाडी घेतली असली तरी महाराष्ट्रातही आता काम वेगाने सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्पास झालेल्या नुकसानीची भरपाई होत असून, 2028 पर्यंत बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू होईल,” असे फडणवीस म्हणाले.
वाढवण बंदराशी जोडणी
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन वाढवण बंदराशी देखील जोडली जाणार आहे. याआधी अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवणजवळ बुलेट ट्रेन स्टेशन उभारण्याची घोषणा केली होती.
प्रवासाचा वेळ आता केवळ 3 तास
- एकूण 508 किमी लांबीच्या या प्रकल्पामुळे मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ 6-8 तासांवरून फक्त 3 तासांवर येणार आहे.
- 2026 मध्ये सुरत-बिलीमोरा या 50 किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात येणार आहे.
- संपूर्ण मार्गावर 12 स्थानके असतील, तर मुंबईतील स्टेशन अंडरग्राऊंड स्वरूपात उभारले जाणार आहे.
आर्थिक भागीदारी आणि गुंतवणूक
- 1.1 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प, जिथे जपान सरकार भारताला 88,000 कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन 0.1% व्याजदराने देत आहे.
- या कर्जाची परतफेड 50 वर्षांच्या कालावधीत, कर्ज मिळाल्यानंतर 15 वर्षांनी सुरू होणार आहे.
- प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये केली होती.