बिहार निवडणूक जवळ येताच भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू- रोहित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू झाले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केला आहे. बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत. विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचे काम विरोधकांनी बंद करावे, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही, असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपने बिहारच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केल्यापासून महाराष्ट्रातील घडामोडी आणि राजकारणाची बिहारमध्ये चर्चा सुरू झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. देवेंद्र फडणवीस फडणवीस सध्या बिहारमध्ये असून पत्रकार परिषदांमध्ये ते राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीकडून आमदार रोहित पवार यांनी अनेकदा यावर भाष्य केले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘बिहार निवडणूक जवळ येताच महाष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू झाले. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’, ‘माझे अंगण,माझे रणांगण’ यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय, परंतु आपली जनता सूज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याचं काम विरोधकांनी बंद करावे. महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही.’

भाजप सरकारच्या काळात आणि भाजपची सत्ता असलेल्या अन्य राज्यांत घडलेल्या घटनांकडेही पवार यांनी लक्ष वेधत म्हटले आहे की, ‘शेतकरी धर्मा पाटील यांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झाले. आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार, खूना सारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत. सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारले जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात अशी घणाघाती टीका रोहित यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार आहे. मात्र काही लोकांना दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे अशी माहितीही रोहित यांनी दिली.

याशिवाय मुंबईतील एका घटनेचा आधार घेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावरही पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठरावीक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment