Satara News : पुसेसावळीत ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? राड्यात जखमी झालेल्यांवर ‘या’ 2 ठिकाणी उपचार सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत दोन गटांत झालेल्या राड्यात दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मात्र, रविवारच्या ‘त्या’ रात्री नेमकं अस काय घडलं? की त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्हाच हादरून गेला. त्या रात्री संतप्त जमावाने तोडफोड, जाळपोळ करत ‘त्या’ युवकाला मारहाण केली. त्याच्याशिवाय इतरांना देखील मारहाण केली. या मारहाणीत अतिशय गंभीर जखमी झालेल्या त्याचा मृत्यू झाला. तर इतर 10 जण जखमी झाले. त्यांच्यावर कराड आणि सातारा या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी 23 जणांना ताब्यात घेतले असून 19 जणांना अटक केली आहे. नूरहसन लियाकत शिकलगार (वय ३२) असे ठार झालेल्याचे नाव आहे. संपूर्ण पुसेसावळी गावात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर जिल्ह्यातही उद्या दि. 13 तारखेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

घटनेचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटत असून सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे. इंटरनेट सेवा बंद करून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दंगलप्रकरणी आतापर्यंत 39 जणांची नावे निष्पन्न झाली असून एकूण 100 संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील 19 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आणखी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुसेसावळी येथे रविवारी रात्री जाळपोळीची घटना घडल्यानंतर या घटनेची माहिती मिळताच औंध पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अचानक जमाव वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यानंतर तातडीने सातारा जिल्हा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर पोलिस कुमक पाठवण्यात आली. पोलिसांनी शांततेचे आवाहन करत जमाव पांगवला. रात्रभर पोलिसांनी गस्त केली.

जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख स्वत: घटनास्थळी राहिले. संपूर्ण रात्रभर ते ठाण मांडून होते. यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर, डी. वाय. एस. पी. अश्विनी शेंडगे व अन्य अधिकारीही तळ ठोकून होते. विभागातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी, राखीव फोर्सने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे. पुसेसावळीत वातावरण तणावपूर्ण असून गावात कर्फ्यू लावण्यात आला आहे

‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

खटाव तालुक्यातील पुसेसावळी हे छोटेसे गाव. या गावात काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर देवदेवतांच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकरणावरुन गावात गेली काही दिवस धुसफूस सुरु होती. त्यातच रविवारी सायंकाळी 2 युवकांच्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली. त्याला उत्तर देणारी पोस्ट लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर जमाव जमला आणि या जमावाने हल्ला केला. यावेळी संतापलेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन वाहने देखील जाळली.

तसेच रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांच्या हातगाड्यांची मोडतोड केली. त्यानंतर संतप्त जमाव मशिदीकडे गेला. तेथे उपस्थित असणार्‍या नागरिकांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. जाळपोळ करणारा जमाव कमालीचा हिंस्त्र बनला. आरडाओरडा ऐकून मशिदीमधून काहीजण बाहेर आले. तेथे मशिदीतून बाहेर आलेल्यांवर संतप्त जमाव अक्षरश: तुटून पडला आणि हाणामारीला सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार फरशी, दांडकी, दगडांनी मारहाण करण्यात आली. यात नूरहसन लियाकत शिकलगार (वय 32) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय इतर 10 हून अधिक जण जखमी झाले.

पहा ‘ते’ दहाजण कोण?

यामध्ये अब्दुल कादर जैलानी (वय 55), वसीम बालम मुल्ला (वय 30, दोघे रा. वाघेरी, ता. कराड), सरफराज ईलाही बागवान (वय 45), सोहेल नजीर बागवान (वय 22), अमन असिफ बागवान (वय 20), समीर ईलाही बागवान (वय 50), अस्लम बाबासाहेब शेख (वय 32), अकिल नजीर इनामदार (वय 40), इस्माईल बशिर बागवान (वय 33), सैफअली हारुण बागवान (वय 29, सर्व रा. पुसेसावळी, ता. खटाव) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर सातारा व कराड येथे उपचार सुरु आहेत.