Wednesday, March 29, 2023

श्रीकृष्णाची 300 वर्ष जुनी मूर्ती चोरीला! औरंगाबादेत खळबळ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेंदूरवादा येथील मध्वनाथ महाराज मठातील समाधी समोरील श्रीकृष्णाची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 300 वर्षांपूर्वीची अत्यंत दुर्मिळ मूर्ती चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यातील राज्यातील मूर्ती चोरीची ही तिसरी घटना आहे.

मध्वनाथ महाराजांचा मठ हा औरंगाबाद जिल्ह्यातील अत्यंत पुरातन मठ आहे. या मंदिरात गेल्या 300 वर्षांपासून श्रीकृष्णाची मूर्ती होती. अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेली ही मूर्ती चोरीला गेल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी धाव घेत घटनस्थळाची पाहणी केली.

- Advertisement -

दरम्यान, देवाची मूर्ती चोरीला जाण्याची मराठवाड्यात ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जालना जिल्ह्यातील जांब समर्थ या रामदास स्वामी यांच्या मूळ गावी चोरीची घटना घडली होती. त्या चोरीचा अजून उलगडा झाला नसतानाच आता औरंगाबादेतही 300 वर्ष जुनी श्रीकृष्णाची मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे.