आज दिल्लीत INDIA आघाडीची चौथी बैठक; जागा वाटपाविषयी होणार चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी देशामध्ये सर्व पक्षांची एकत्रित इंडिया आघाडी स्थापित झाली आहे. यापूर्वी इंडिया आघाडीच्या पाटणा, बेंगळुरू आणि मुंबई एकूण तीन बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या दिवशी ही बैठक दुपारी तीन वाजता दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. या बैठकीला हजेरी लावण्यासाठी एक दिवस अगोदरच आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, जेडीयू नेते नितीश कुमार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचले होते.

दिल्लीत आज पार पडणाऱ्या बैठकीत 28 पक्षांचे प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचा समावेश असणार आहे. आजच्या बैठकीच्या माध्यमातून विरोधी पक्षांची पुन्हा एकजूट करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर आगामी निवडणुकांसाठीचे बरेच मुद्दे आजच्या बैठकीमध्ये चर्चेचा भाग बनतील. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य म्हणजे आज होणाऱ्या बैठकीत जागा वाटपाविषयी देखील चर्चा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीचा अंदाज बांधता इंडिया आघाडी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. परंतु त्यापूर्वी आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची जास्त गरज आहे.

दरम्यान, इंडिया गाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. त्याचबरोबर, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांची देखील अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. महत्वाचे म्हणजे इंडिया आघाडीची आज होणारी बैठक गेल्या 6डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु अनेक कारणांमुळे तिची तारीख पुढे ढकलण्यात आली.