‘इंडिया’चे भारत झाल्यानंतर देशात नोटबंदी होणार? बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील मोदी सरकार देशाच्या इंडिया (INDIA) या नावाऐवजी भारत या नावासाठी आग्रही होताना दिसत आहे. देशातील अनेक नेते याबाबत बोलताना दिसून येत आहेत. भारत या नावासाठी मोदी सरकारच्या हालचाली वाढल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांनी मात्र वेगळीच शंका निर्माण केली आहे. इंडिया नावाऐवजी भारत हे नाव वापरण्यास सुरुवात केल्यास मग सगळीकडेच भारत असं लिहावे लागेल. मग नोटेवरही भारत लिहावं लागेल? असं म्हणत वडेट्टीवार यांनी नोटबंदीची (Demonetisation) शंका निर्माण केली.

सध्या काँग्रेसची राज्यभर पदयात्रा चालू आहे. त्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे विजय वडेट्टीवार म्हणाले, इंडिया हे नाव न वापरता फक्त भारत असे जर देशाचे नाव करण्यात आले तर देशात नोटबंदी होऊ शकते. केंद्र सरकारने 18 सप्टेंबर पासून 5 दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. ह्या अधिवेशनात देशाचे नाव इंडिया हटवून भारत ठेवण्यासाठी विधेयक सरकार आणणार असल्याच्या चर्चा आहेत. असे विधेयक जर संसदेने पास केले तर नोटांवरील इंडिया नाव हटवावे लागेल. करा मग नोटबंदी . हे सगळं इंडिया आघाडीला घाबरून चालले आहे असं वडेट्टीवार यांनी म्हंटल.

आताचे सरकार म्हणजे तिजोरी लुटणारे सरकार – वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील इतर समस्यावरही सरकारला धारेवर धरले. आताचे सरकार म्हणजे तिजोरी लुटणारे सरकार आहे. पूर्वी आली बाबा चाळीस चोर म्हणायचे. मात्र आता दोन आली बाबा आणि 80 चोर आहेत, अशी राज्याची स्थिती आहे. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 56 इंच छाती फुगवून सांगणाऱ्यांना दुसऱ्याची घर फोडायची वेळ आलीय. कारण तुम्ही स्वकर्तुत्वाने काहीही मिळविले नाही. टीव्ही एक आणि रिमोट तीन अशी राज्याची स्थिती झाली आहे असं म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस आणि अजितदादांवर निशाणा साधला.