मी राजकारणात आलो नसतो तर.., अजित पवारांनी बोलून दाखवली मनातली इच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोर्‍हाळे बुद्रुक येथील श्रीराम ऊसलागवड पॅटर्नला भेट दिली. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. अजित पवार म्हणाले की, जर मी राजकारणात आलो नसतो तर नक्कीच चांगली शेती केली असती. शेती करणे कोणालाही जमत नाही.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “समाजात सटरफटर गप्पा मारणार्‍यांची कमी नाही. उगाच एकत्र येत अनेक विषयांवर गप्पा मारल्या जातात. त्या कुठच्या कुठे पोहोचतात. दादाने असा का निर्णय घेतला असेल अशाही चर्चा होतात. परंतु मी गेली 32 वर्षे राजकारणात आहे. मी घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यात जास्त हित बारामतीकरांचे झाले आहे, अन्यथा पाण्याचे काय झाले असते याची कल्पना न केलेली बरीच”

यानंतर त्यांनी सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष स्व. रामचंद्र भगत यांच्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या. यावेळी अजित पवार म्हणाले की, “साडेतीन दशके रामचंद्र भगत हे सोमेश्वरवर संचालक होते. 1991 ला मी बँकेला उभा राहिलो असताना पश्चिम भागात ज्यांनी मला साथ दिली, त्यात भगत अग्रस्थानी होते. त्यांची व माझी विचारसरणी भिन्न होती. परंतु त्या वेळी त्यांनी मला दोन मतांचे सहकार्य केले. त्यानंतर त्यांची व माझी गट्टी जमली. ती जिवात जीव असेपर्यंत टिकली”

दरम्यान, श्रीराम ऊस लागवड पॅटर्नचे कौतुक करत अजित पवार म्हणाले की, “बारामती बाजार समितीत सर्वात जास्त भुसार माल भगत कुटुंबीयांकडून दिला जातो. ते फक्त राजकारण, समाजकारण करत नाहीत, तर उत्तम शेती करतात” यानंतर सोमेश्वरचे संचालक सुनील भगत, प्रगतशील शेतकरी विलास भगत यांनी अजित पवार यांना ऊस शेती विषयक इतर माहिती दिली.