थोरात- पटोले वाद मिटला? दोन्ही नेते पत्रकार परिषदेत एकत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवणुकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. अखेर आज दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेस एकसंघ आहे, आमच्यात कोणताही वाद नाही असं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला असेल.

आज काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात शेजारी शेजारी बसले होते. काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही वाद नाही. काँंग्रेस एकसंघ आहे. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी केलेलं एक वातावरण होतं असे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. यावेळी पत्रकारांनी नाना पटोले याना बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीच्या पत्राबाबत विचारलं असता बाळासाहेब थोरातांनी नाराजीचं पत्र पाठवलं तर त्या पत्राची एक कॉपी तरी दाखवा. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र तर दाखवा, असा उलट सवाल त्यांनी केला.

 

यावेळी नाना पटोले यांनी सनसनाटी गौप्यस्फोट सुद्धा केला. अमरावती निवडणुकीत 50 कोटी रुपये देऊन निकाल फिरवण्यात येणार होता, पण मी कमिशनरला इशारा दिला आणि ते टळलं असा दावा त्यांनी केला. मला गुप्तचर खात्यातून एका मित्राचा फोन आला. अमरावतीचा निकाल बदलण्याची भाजपची तयारी सुरु असून त्यासाठी 50 कोटी देण्यात येणार आहेत. ही रक्कम 100 कोटींपर्यंत देखील जाऊ शकते असा धक्कादायक दावा करत पटोले यांनी खळबळ उडवून दिली.