मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यात मध्यंतरीच “छगन भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा” अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले होती. या मागणीनंतर स्वतः छगन भुजबळांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मी गेल्या 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे” अशी माहिती आज भुजबळांनी दिली आहे. या गौप्यस्फोटानंतर राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे.

आज एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळांनी सांगितले की, “मी भाषण करतो म्हणून विरोधी पक्षनेते माझा राजीनामा मागतात. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको.”

पुढे बोलताना, “मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. आता शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी?” असा सवाल छगन भुजबळांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

सर्व्हे सगळा खोटा आहे…

दरम्यान, “मागासवर्गीय आयोगाचा सर्व्हे सगळा खोटा आहे. कर्मचारी घरोघरी जात आहेत, 180 प्रश्न आहेत. एका घराला दीड तास लागतो. तपासणी करणारे कधी 25, कधी 50 घरांची तपासणी केली सांगून टाकतात. त्यात केवळ जात विचारली जाते, बाकी सगळे आपोआप भरले जाते. बंगला असला तरी झोपडी, घराबाहेर गाड्या असल्या तरी काहीच नाही सांगितले जाते” असे म्हणत छगन भुजबळ यांनी राज्यात सुरू असलेल्या सर्वेक्षणावर देखील बोट ठेवले आहे.