पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व; भाजपचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नामकरण पवारांनी दिले आहे. मात्र यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल करत शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे !! अशी खोचक टीका बावनकुळेंनी केली आहे. तसेच पवारांच्या जुन्या राजकीय इतिहासाचा दाखलाही बावनकुळेंनी दिला.

याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हंटल, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे !!

१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले. १९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. १९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली. २०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला! २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. बावनकुळेंच्या या टीकेला शरद पवार गटाकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणे महत्वाचे ठरेल .