महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचं काम सुरू?;शिवसेनेची सामनातून भाजपवर घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजपने घेतलेल्या भूमिकेवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे. “वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात का दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय?”, असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ‘नायक’ नसते तर देशाच्या स्वातंत्र्य लढय़ास प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा घाट घातलाच नसता. टिळकांनी गणपती व शिवराय घरातून मांडवात आणले. शिवाजी-भवानीच्या नावानेच संयुक्त महाराष्ट्राचा लढादेखील पेटवला व जिंकला गेला हे विसरून चालणार नाही.

आता मुंबई महाराष्ट्रास मिळाली. शिवसेनेसारखे ज्वलंत राष्ट्रीय बाण्याचे संघटन तर शिवाजी राजांच्या प्रेरणेतूनच उभे राहिले. शिवराय कालबाहय झाले असते तर त्यांचे नाव कशाला कोणी घेतले असते? प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावर इस्लामी व अरब राष्ट्रांनी निषेध करताच भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचे मात्र समर्थन केले जाते! बदनामी करणाऱ्यांचा केसही वाकडा झाला नाही. ते त्यांच्या पक्षात आणि पदावर कायम आहेत, असे सामानातून म्हंटले आहे.