अजित पवार यांना हिंदुस्थानातून हाकलून पाकिस्तानात पाठवा; भाजप नेत्याचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. धर्मवीर म्हणू नका, असे आवाहन केले. अजितदादांच्या या विधावरून भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी “अजित पवार यांना भारतात राहण्याचा अधिकारच नाही त्यांना थेट पाकिस्तानात पाठवा,” अशी मागणी केली आहे.

नरेंद्र पवार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अधिवेशनात अजितदादांनी जे विधान केले आहे त्याबद्दल खरंतर त्यांना हिंदुस्थानातून हाकलून दिले पाहिजे. पाकिस्तानमध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहित नाही ते महाराष्ट्राचं दुर्देव आहे. संभाजी महाराज यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांचे हाल केले, त्यांनी धर्मांतर करावे म्हणूनच हाल केले. पण संभाजी महाराजांना धर्माचा अभिमान होता. त्यांनी धर्मासाठी प्राणांची आहुती दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी महाराजांची जगात ओळख आहे. महाराष्ट्रातील एक नेते अजित पवार हे संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत. त्यामुळे खरंच यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे. मी निषेध करणार नाही पण मागणी करेल. ज्यांना शिवाजी महाराज माहीत नाही, ज्यांना संभाजी महाराज माहीत नाही, ज्यांना संभाजी महाराज धर्मवीर होते हे माहीत नाही, त्यांना या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे पवार यांनी म्हंटले.