झेलम नदीत प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली; 4 जणांचा मृत्यू, शालेय विद्यार्थ्यांसह अनेकजण बेपत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| श्रीनगरच्या बटवारमध्ये असलेल्या झेलम नदीत (Jhelum River) मंगळवारी सकाळच्या वेळी प्रवाशांनी भरलेली बोट बुडण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीत शालेय विद्यार्थ्यांसह 12 हून अधिक प्रवासी बसले होते. यातील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या तीन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी ही बोट गंडाबलहून श्रीनगरच्या बटवार दिशेने निघाली होती. परंतु त्यापूर्वीच झेलम नदीत ही बोट बुडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे झेलम नदीच्या पाण्याची पातळी खूप उंचावली आहे. तर सोमवारी झालेल्या पावसामुळे भूस्खलन झाल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे प्रवासासाठी बंद होता. त्यामुळे बोटीने प्रवास करण्याचा एकमेव मार्ग स्थानिकांकडे शिल्लक होता. मंगळवारी दररोजप्रमाणे काही स्थानिक आणि शालेय विद्यार्थी बोटीतून बटवारच्या दिशेने निघाले होते. परंतु नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि प्रवासी संख्या ही जास्त असल्यामुळे ही बोट मध्यमागी येताच पाण्यात उलटली.

या दुर्घटनेमुळे चार जणांना आपला जीव गमवावा लागला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. सांगितले जात आहे की, 10 शालेय विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम SDRF आणि इतर अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. तर निर्माण झालेली परिस्थिती पाहता घटनास्थळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तैनाब करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर बचाव पथकाने 4 लोकांना नदी पत्रातून बाहेर काढले. तसेच, इतर प्रवाशांना शोधण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले.