महा विकासाघाडीला १०० दिवस पूर्ण; मुख्यमंत्री म्हणून ‘हा’ एक निर्णय उद्धव ठाकरेंना सर्वात जास्त समाधान देणारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोठ्या सत्तासंघर्षांननंतर तीन पक्षांच्या अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या शतकपूर्तीच्या निमित्तानं उद्धव यांनी आज विधानभवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी गेल्या १०० दिवसांतील सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. राज्यात अवकाळी पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला असतांना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. अशा परिस्थतीत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्री म्हणून मला सर्वात समाधान देणारा निर्णय होता,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं.

विधानभवनात घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकरी कर्जमाफी संदर्भांत विस्तृत माहिती दिली. हिवाळी अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचं २ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. १० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. कर्जमुक्ती योजनेचे काम व्यवस्थित सुरू आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची सुरुवात झाली आहे. पूर्वीप्रमाणे त्यांना हेलपाटे मारावे लागले नाहीत. रांगेत उभं राहावं लागलं नाही,’ असं मुख्यमंत्री यावेळी माहिती देताना म्हणाले.

दरम्यान, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांतील ५ लाख शेतकऱ्यांची यादी तयार आहे. मात्र, आचारसंहितेमुळं आम्ही ती लावू शकलेलो नाही. मात्र, मागील दोन महिन्यांत शेतकऱ्यांनी अजिबात संयम सोडला नाही, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment