‘निसर्ग’ चक्रीवादळाचा हवाई वाहतुकीला फटका! मुंबई विमानतळ बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या निसर्ग वादळामुळं मुंबई आणि परिसरात सोसाट्याचे वारे आणि विमान घसरल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या निसर्ग वादळामुळं अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे.

याच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबई विमानतळावर आज उतरलेले फेडेक्स कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले. हे विमान बेंगळुरूहून आले होते. या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. आता विमान बाजूला करण्यात आलं आहे. मात्र, हा अपघात आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन अनुचित प्रकार टाळण्यासाठी विमानतळ प्राधिकरणानं तूर्त उड्डाणं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी ७ नंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतं.

दरम्यान, कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले व रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान करणारे निसर्ग वादळ आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकल्याची माहिती आहे. असं असलं तरी मुंबईचा धोका अद्याप कमी झालेला नाही. वादळानं दिशा बदलल्यानं मुंबईत वाऱ्या-पावसाचा जोर कमी झाला आहे. तर, नाशिकमध्ये पाऊस सुरू झाला आहे. हे वादळ पुढे कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करणार, याकडं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment