रयत कारखान्याच्या चेअरमनपदी अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शेवळेवाडी (म्हासोली) (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडी बिनविरोध होऊन चेअरमनपदी अँड. उदयसिंह पाटील – उंडाळकर तर व्हाईस चेअरमनपदी आप्पासाहेब गरुड यांची पुनश्च निवड झाली. कारखान्याच्या कार्यालयात अध्यासी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.

रयत सहकारी साखर कारखान्याची 21 जागासाठी निवडणूक जाहीर झाली होती. कारखान्याचे संस्थापक लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या विचारातून व कारखान्याचे विद्यमान चेअरमन उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध होऊन आज पदाधिकारी निवडीही बिनविरोध झाल्या. चेअरमन पदासाठी उदयसिंह पाटील व व्हा. चेअरमन पदासाठी आप्पासाहेब गरुड यांचा एकच अर्ज आला होता. त्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस एस संकपाळ, संचालक प्रदीप पाटील, पंजाबराव देसाई ,पी बी शिंदे, जगन्नाथ माळी, तुकाराम काकडे ,प्रशांत पाटील ,आनंदराव पाटील ,अर्जुन पवार, हिम्मतराव पाटील, शेखर देशमुख यासह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना चेअरमन उदयसिंह पाटील म्हणाले, रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना ज्या उद्देशाने विलासकाकांनी केली होती. तो उद्देश आज सफल होताना दिसतो आहे. अथणीशुगरच्या माध्यमातून रयत कारखान्याने सभासदांचे हित जोपासताना इतर कारखान्याच्या बरोबरीचा एक रकमी ऊस भाव शेतकऱ्यांना पोच केला आहे. याबरोबर गेल्या सात वर्षात अथणी शुगर च्या सहकार्याने रयत कारखाना पूर्णपणे कर्जमुक्त केला असून ही कारखान्याच्या दृष्टीने संचालक मंडळाला आलेले सर्वात मोठे यश आहे. यापुढील काळात ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे हित जोपासण्या बरोबर ऊसाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे. याबरोबर कारखान्याचे पाच हजार मे टना पर्यंत विस्तारीकरण,को जन प्रकल्प, डिस्टलरी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक व स्वागत कारखान्याचे नूतन संचालक अँड. शंकरराव लोकरे यांनी केले. आभार संचालक आत्माराम देसाई- गुरुजी यांनी मानले.