‘सारथी’बाबतचा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही!- खासदार संभाजीराजे भोसले

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘सारथी’ संस्थेबाबतचा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय मराठा समाजाची एकही मागणी त्यांनी पूर्ण केली नाही असा आरोपही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी केला. या संस्थेबाबत सुरू असलेला पोरखेळ चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, सरकारचा हा दुटप्पीपणा चालणार नाही. मी कोणत्या पक्षाची भूमिका मांडत नाही. अजून वेळ गेली नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने यामध्ये हस्तक्षेप करत मागण्यांची पूर्तता करावी, याबाबत तातडीने बैठक घ्यावी, अन्यथा पुन्हा एकदा मराठा समाजाला आंदोलन करावे लागेल. समाजाने हे आंदोलन सुरू केले तर मी त्यांच्या पाठीशी असेन असा इशाराही त्यांनी दिला.

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या सारथी या संस्थेच्या विविध मागण्यासाठी ११ जानेवारीला आम्ही पुण्यात आंदोलन केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी येऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री ठाकरे देखील माझ्याशी बोलले. त्यांनी देखील शब्द दिला. पण प्रत्यक्षात त्यांनी तो पाळला नाही. या संस्थेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला निधी दिला नाही. दिलेला निधी परत पाठवला. संस्थेतील अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला म्हणून त्याची चौकशी केली. पण नंतर त्याबाबत निकाल दिला नाही. तो चुकला असेल तर शिक्षा का केली नाही. हे करण्यामागे केवळ मराठा समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप संभाजीराजे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here