Cyclone Alert : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर कर्नाटक-गोवा किनारपट्टीपासून काही अंतरावर पूर्व-मध्य अरबी समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याच्या दिशेने आहे. येत्या काही तासांत हे प्रणाली अधिक तीव्र होत जाईल आणि २२ मेपर्यंत हे (Cyclone Alert) एक खोल दाबाचं क्षेत्र (Deep Depression) बनू शकते.
सध्या ही हवामान प्रणाली 16.5 अंश उत्तर अक्षांश आणि 71.5 अंश पूर्व रेखांशावर केंद्रित आहे. पुढील कालावधीत ही प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. समुद्रसपाटीचे तापमान आणि हवामानातील इतर घटक या प्रणालीच्या तीव्र होण्यासाठी पोषक ठरत आहेत. त्यामुळे, ही प्रणाली पुढे जाऊन एक चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे.
जर ही प्रणाली चक्रीवादळात परिवर्तित झाली, तर यावर्षीचं हे पहिलं चक्रीवादळ (Cyclone Alert) ठरणार आहे. संभाव्य वादळाचा परिणाम गुजरातच्या दक्षिण भागावर, विशेषतः सौराष्ट्र किनारपट्टीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, याचे परिणाम महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरही जाणवू शकतात.
या राज्यांमध्ये मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
येत्या ६ ते ७ दिवसांत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः कोकणातील जिल्हे – सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या भागांमध्ये जोरदार पावसाचा धोका संभवतो.
स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, सध्या तयार होत असलेल्या हवामान प्रणालीबाबत अचूक अंदाज देणे अवघड असते, कारण अशा प्रणाली काही काळ समुद्रातच फिरत राहतात आणि नंतर दिशा बदलतात. त्यामुळे याच्या मार्गावर आणि ताकदीवर नजीकच्या ३६ तासांत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. किनारपट्टी भागांतील प्रशासनालाही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच आवश्यक ती तयारी ठेवावी, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.
पावसाचा जोर वाढल्यास शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक सेवा यावरही परिणाम होऊ शकतो. त्यासाठी जिल्हा प्रशासनांकडून योग्य त्या पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. संभाव्य वादळामुळे वीज पुरवठा, रस्ते वाहतूक आणि दूरसंचार सेवेवरही परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एकूणच, पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीसाठी हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून नागरिकांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणे, अफवांपासून दूर राहणे आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.