राहुल कुल यांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला रमेश थोरात यंदातरी सुरुंग लावतील का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2009 चा अपवाद वगळला तर दौंडमध्ये फक्त आणि फक्त राहुल कुल हाच फॅक्टर निर्णायक ठरला… पक्ष बदलले.. नाईलाजाने भूमिका बदलाव्या लागल्या.. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले… पण द़ौंडवरची आपली पकड राहुल कुल यांनी किंचीतही सैल होऊ दिली नाही… होय मी बोलतोय राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात यांच्यातील राजकीय वैराबद्धल… मी बोलतोय दौंड विधानसभा मतदारससंघातील राजकीय संघर्षाबद्धल… येणाऱ्या विधानसभेला राहुल कुल आणि रमेश थोरात एकमेकांच्या आमने – सामने असणारयत, हे तर फिक्स आहे. सलग दोन टर्म आमदार असणाऱ्या राहुल कुल यांना कोंडीत पकडण्याचा थोरातांनी अनेकदा प्रयत्न केले… पण अखेर सरशी झाली ती कुल यांचीच… त्यामुळे येणाऱ्या आमदारकीला दौंडमध्ये नेमकं कोण जिंकतंय? दौंडच्या जनतेच्या मनातील आमदार कोण होतोय? त्याचाच घेतलेला हा आढावा…

कांचन कुल काही बाहेरच्या नाहीत, त्या आपल्या घरच्याच आहेत… मी राहुलला आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. राहुलला घड्याळमध्ये यायला लावा, उद्या मंत्री करतो. लोकसभेला सुनेत्राताईंचा प्रचार करण्यासाठी एकाच स्टेजवरुन राहुल कुल यांना अजितदादांनी दिलेला हा शब्द. हा फक्त शब्द नव्हता पण ही सुरुवात होती दौंडच्या राजकारणातील नव्या सुरुवातीची… राष्ट्रवादी अजित पवार आणि राहुल कुल यांच्यातील राजकीय विस्तव या लोकसभेच्या निम्मिताने विझला.. राहुल कुल यांनीही सुनेत्राताईंचं अगदी प्रामाणिकपणे काम केलं… दौंडमधून कुल अजितदादांना लीड देऊ शकले नाहीत हा भाग वेगळा पण कुल अजितदादांच्या जवळच्या गोटात जाऊन बसलेत… अर्थात अजितदादा गटात मोठ्या विश्नासाने आलेल्या रमेश थोरात यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे… कारण विद्यमान आमदार असणाऱ्या राहुल कुल यांचं तालुक्यातला कनेक्ट चांगलाच वाढलाय.. त्यात भाजपनंही कुल यांना वारंवार ताकद देत कुल यांच्या पॉलिटीकल फेसला तालुक्यात बेस मिळवून दिलाय… त्यामुळे ज्याचा आमदार त्याला तिकीट असाच फॉर्मुला ठरला तर राहुल कुल हेच महायुतीचे आमदारकीचे उमेदवार असतील, हे कन्फर्म आहे.. त्यामुळे दादांचा शिलेदार आणि कुल यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या माजी आमदार रमेश थोरात यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय राहीलेला नाहीये…

YouTube video player

खरंतर राहुल कुल यांना राजकीय वारसा मिळाला तो त्यांचे वडील सुभाष कुल यांच्याकडून.. १९९० साली ते पहिल्यांदा दौंडमध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले… यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहीलं नाही…यानंतर दौंडवर कुल कुटूंबाचा आमदारकीवर एकहाती दबदबा राहीला. सुभाष कुल त्यांच्या पत्नी रंजना कुल आणि पुढे मुलगा राहुल कुल हे निवडणुका लढत गेले.., जिंकत गेले.. अपवाद फक्त २००९ चा… २००९ ला राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुक लढवली पण अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी त्यांचा दारुण पराभव केला. कुल कुटूंबातला हा पहिलाच राजकीय पराभव.. यानंतर शरद पवारांनी विजयी उमेदवार रमेश थोरात यांना पक्षात घेतलं आणि मग सुरु झाला थोरात विरुद्ध कुल हा न संपणारा राजकीय संघर्ष… राहुल कुल हे यानंतर पवार घराण्यापासून फटकून राहीले.. २००९ च्या पराभवाचा वचपा त्यांनी २०१४ च्या विधानसभेला काढलाच… थोरातांचा पराभव करत ते रासपच्या तिकीटावर पराभूत झाले… पुढे २०१९ ला तर भाजपच्या तिकीटावर त्यांनी सलग दुसऱ्यांदा थोरातांना मात दिली पण हा त्यांचा निसटता पराभव राहीला.. थोरात अवघ्या ६७३ मतांनी पराभूत झाले… राहुल कुल २०१९ ला काठावर पास झाले असले तरी त्यांनी यातून धडा शिकत तालुक्यात बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली…

पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत पक्ष सत्तेत असल्यानं कुल यांनी मतदारसंघात विकासकामांचा सपाटा चालवला… पण त्यांना अडचणीत आणलं ते थोरात यांनीच… भीमा सहकारी साखर कारखान्यावर आर्थिक विस्कळीतपणा आणि 500 कोटींच्या मनी लाँडरिंगच्या आरोपांनी त्यांना चांगलच जाम केलं.. हाच मुद्दा पकडत रमेश थोरात यांनी तालुक्यात कुल यांची कोंडी केली.. गंभीर आरोप केले… कुल यांच्या विरोधात वातावरण बनवलं… पण अजितदादाच महायुतीत आल्यानं आता त्याच कुल यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायची वेळ आली… हे कमी होतं की काय म्हणून अजितदादांनी थोरातांपेक्षा राहुल कुल यांच्या बाजूने लोकसभे्च्या निवडणुकीत साॅफ्ट कॉर्नर दाखवल्यानं थोरातांसाठी सध्या इकडे जाऊ की तिकडे जाऊ अशी परिस्थिती निर्माण झालीय…

करंट स्टेटसमध्ये पाहायला गेलं तर दोन्ही नेत्यांकडे निष्ठावन कार्यकर्त्यांची मोेठी फळी आहे… यापूर्वीच्या ग्रामपंचायतीपासून ते खासदारकीच्या निवडणुकीला कुल – थोरात गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.. त्यांनी अनेक मानसिक आणि आर्थिक ताण सहन केले.. पण यात सर्वात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते थोरातांच्या कार्यकर्त्यांचं… कारण तालुक्यात सर्वाधिक काळ सत्ता ही कुल घराण्याकडे राहिली… आमदार कुल ज्यापक्षात जातात त्या पक्षात त्यांचा कार्यकर्ता एकदिलाने जातात.. कुलही कार्यकर्त्यांना पाठबळ देत राहतात.. पण दुसरीकडे थोरात गटाला तालुक्यात सुरुंग लागला आहे.. थोरातांच्या कार्यकर्त्यांनी कुल गटात उड्या मारल्या आहेत.. त्यात थोरातांनी केलेल्या अनेक राजकीय तडजोडीमुळे ते बॅकफुटला फेकले गेले आहेत… त्यात महायुतीत भाजपने दिलेल्या पाठबळामुळे यंदा राहुल कुल यांच्यासाठी आमदारकी सोपी राहील, असं चित्र आहे.. तर दुसरीकडे दोन्ही टर्मला कडवं आव्हान देणाऱ्या अजितदादांच्या थोरातांसाठी मग अपक्ष निवडणुक लढवण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही… आता उरतो प्रश्न तो महा विकास आघाडीचा.. तर शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी बरीच चर्चा आहे… आता यात थोरातांनी तुतारीची वाट धरली तर राजकारण फिरु शकतं.. पण हे जमून येईल, हे सध्यातरी अवघड दिसतंय… त्यामुळे दोन वर्ष आव्हान देऊनही यंदाही थोरातांची आमदारकीची वाट बिकटच दिसतेय.. तर दुसरीकडे कुल यांच्यासाठी सध्यातरी राजकारण प्लसमध्ये दिसतंय..