प्रतिभासंपन्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी उलगडला आपला जीवनप्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तुम बिन’, ‘थप्पड’, ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’, ‘कॅश’, ‘रावण’ या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याशी युवा दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी मास्टर क्लासमध्ये संवाद साधला. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक निलेश राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी अनुभव सिन्हा म्हणाले की, ‘आर्टिकल १५’ ची कथा मी जेंव्हा माझ्या कार्यालयातील लोकांना ऐकवली तेंव्हा त्यांना ही गोष्ट सध्याची वाटली नाही. आता कुठे अशा घटना घडतात का? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. त्याचवेळी मला असे वाटले की, आता तर हा चित्रपट बनलाच पाहिजे. या चित्रपटाच्या यशामध्ये खूप लोकांचे योगदान असून याचे मला क्रेडिट मिळत असते. चित्रपटसृष्टीत मी तीन दशके काम करूनही लोकं मला दिग्दर्शक म्हणून कमी आणि टेक्निशियन म्हणून अधिक ओळखायचे. मात्र, ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल १५’ पासून मला ‘दिग्दर्शक’ म्हणून ओळख मिळाली आणि जेंव्हा आपल्याकडे यश असते तेंव्हा आपल्याला कोणीही प्रश्न विचारत नाही, असे प्रतिपादन सिन्हा यांनी यावेळी केले.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांच्याशिवाय आपले काही काम होत नाही. अशीच काही लोकं, अभिनेते माझ्या आयुष्यात आहेत, जे माझ्यासाठी काम करतात. मी एखाद्या चित्रपटाची संहिता लिहितानाच ही लोकं माझ्या नजरेसमोर येत जातात आणि ते कधी त्या विशिष्ट चित्रपटाचा भाग बनून जातात हे समजत नाही, असेही सिन्हा यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, माझे १२ वी पर्यंतचे शिक्षण बनारस येथे झाले. त्यानंतरअभियांत्रिकीचे शिक्षण अलिगढ येथे झाले. माझी आवड संगीत, समाज, धर्मनिरेपेक्षता, समाजातील विविधतेकडे होती. रक्ताची भीती वाटते म्हणून मी डॉक्टर न होता अभियंता झालो. अभियंता झाल्यास मी एक वर्ष नोकरी केली, मात्र नोकरी करीत असताना मला जाणवले की, हे तर आपल्याला करायचे नाही. आणि कसलाही विचार न करता मी नोकरी सोडली. एक वर्ष मी मला काय करायचे आहे; याच्या शोधात होतो. माझ्या मित्राचे मोठे भाऊ एक माहितीपट बनवत होते. या माहितीपटासाठी मी सहायक म्हणून कामाला गेलो आणि पहिल्याच दिवशी मला जाणवले की, हेच आहे जे आपल्याला करायचे आहे. त्यानंतर ४ डिसेंबर १९९० मध्ये मुंबईला आलो आणि तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला. ‘शिकस्त’ हा दूर चित्रवाणीवरील माझा पहिला शो होता.

माझ्याबद्दल चित्रपटसृष्टीतील काही मंडळींकडून उपाहासाने असे बोलले जाते की, हा खूप बुद्धिमान राजकीय चित्रपट बनवतो. हा अल्पकाळापुरता या क्षेत्रात राहणार असून याचे काही महत्व नाही. चित्रपटसृष्टी ही एक दंतकथा असून अशी काही गोष्ट अस्तित्वात नाही. इथे कोणी कोणासाठी उभं राहताना दिसत नाही. २०११ – २०१७ मध्ये मी दिग्दर्शक आहे की, नाही असे मला वाटत होते. नवीन चित्रपट काढण्याची हिंमत नव्हती. ‘थप्पड’ हा माझा आवडता चित्रपट असून ‘मुल्क’ चित्रपटाने मला दिग्दर्शक म्हणून ओळख दिली.

प्रेमचंद, महादेवी वर्मा, जयशंकर प्रसाद, नागार्जुन, विजय तेंडुलकर हे आजच्या तरुणाईला माहिती नाही. त्यांनी या महान लोकांना वाचले नसून त्यांनी संगीतही एकलेले नाही. खूप सारी दिशाभूल करणारी माहिती घेऊन त्यावर ते विश्वास ठेवत आहेत. भाषेचा कोणताही धर्म नसतो आणि या देशातील भाषा आपण शिकायला हव्यात. आजच्या तरुणाईला केवळ रिल्स पहायच्या आहेत. कबीर, रहीम, रवींद्रनाथ टागोर या महान लोकांबद्दल माहितीच नाही. रामायण कधी वाचले नाही, त्याबद्दल काही माहिती नाही आणि त्यावर तरुण व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत: आजचा तरुण खूप उथळपणे प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून पुढे जाताना दिसत आहे. भारताची संस्कृती, कला, साहित्य याबद्दल त्यांना माहिती नसून त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे, असेही सिन्हा यावेळी म्हणाले.

अनुभव सिन्हा पुढे म्हणाले, मी माझ्या देशावर मनापासून प्रेम करतो. प्रेम म्हणजे एखाद्याबद्दल केवळ चांगले बोलणेच नसते. आपल्या आईवर आपले प्रेम असते तरी आपण तिच्या चुकीच्या गोष्टीबद्दल बोलतोच की! याचा अर्थ आपले आपल्या आईवरील प्रेम कमी झाले का? नाही ना! घरातील वडील, बहीण, भाऊ, दोस्त आणि देशावरही आपण टीका करू! शेवटी, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करताहेत आणि या सगळ्या प्रकारच्या मते असणाऱ्या लोकांनी समाज बनतो.

पद्मभूषण जावेद अख्तर यांनी खास ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट पाहण्यासाठी संभाजीनगर मधील आपला मुक्काम वाढवला होता आणि आज त्यांनी प्रेक्षकांसमवेत ‘आर्टिकल १५’ हा सिनेमा पाहिला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आपल्या मास्टर क्लासमध्ये बोलताना म्हणाले की, मला आज या मंचावर बसताना खूप अवघडल्यासारखे वाटत आहे कारण खरे मास्टर ‘जावेद अख्तर’जी प्रेक्षकांत बसले आहेत. मी त्यांच्याकडून आणि त्यांच्या मुलाखतीतून शिकत आलोय; तेंव्हा जावेद अख्तर म्हणाले की, “मी आपले चित्रपट पाहून शिकतो.”