खाद्यतेल होणार स्वस्त; सरकारकडून दर कमी करण्याच्या कंपन्यांना सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने होरपणाऱ्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना दर कमी करण्यास सांगितले आहे. तेलाच्या जागतिक किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा देशातील नागरिकांनाही मिळावा यासाठी खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या सूचना केंद्राने दिला आहे. तेलाच्या किमतीत 6 % पर्यंत घट पाहायला मिळणार आहे, त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारच्या या सूचनेनंतर फॉर्च्युन, धारा आणि जेमिनी या ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किमती 20 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे तर धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने आपल्या MRP मध्ये 15 ते 20 रुपये प्रति लिटरने कपात केल्याचे सांगितले आहे. येत्या 3 महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात गृहिणींना थोडयापार प्रमाणात का होईना परंतु दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. भारताने वर्ष 2021-22 (नोव्हेंबर-ऑक्टोबर) दरम्यान 1.57 लाख कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात केले . आपण मलेशिया आणि इंडोनेशिया येथून पामतेल खरेदी करतो तर सोयाबीन तेल अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते. सरकारी आकडेवारीनुसार, पॅकिंग केलेल्या शेंगदाणा तेलाची किंमत 189.13 रुपये प्रति किलो, मोहरीचे तेल 150.84 रुपये प्रति किलो, सोयाबीन तेल 138.2 रुपये प्रति किलो, सूर्यफूल तेल 145.18 रुपये प्रति किलो आणि पामतेल 150 रुपये आहे.