“औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता” म्हणणाऱ्या आव्हाडांवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाद सुरु झाला आहे. औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं म्हणणाऱ्या आव्हाडांवर एकीकडे भाजपने आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला आहे.

ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, महाराष्ट्रातील अनेक मंदिरं तोडून टाकली, उद्ध्वस्त केली, माय-भगिनींवर अत्याचार केले त्याचा पुळका कोणाला येतो यावरुन त्यांची वृत्ती कळून येते अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील त्यांचे प्रेम वृत्तीतून दिसून येतं. याचा निषेध करावा तितका कमी आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते-

छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आले आणि तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आले. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.