काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। जम्मू आणि काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ५ ऑगस्ट रोजी हटवण्यात आल्यानंतर, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून केंद्राच्या निर्बंधांनंतर काश्मिरातील हस्तव्यवसाय, पर्यटन आणि ई-कॉमर्स या व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, असा दावा काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (केसीसीआय) अध्यक्ष शेख आशिक हुसेन यांनी केला आहे.

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवले आणि या राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. त्यानंतर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे केसीसीआयच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. हा प्राथमिक अंदाज असून याबाबतची तपशीलवार माहिती एका आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल, असेही हुसेन यांनी सांगितले.

हॉटेल आणि रेस्तराँ उद्योगात ३० हजार जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर ई-कॉमर्स आणि संबंधित कुरिअर सेवांमध्ये १० हजार जणांचा रोजगार गेला आहे. आयटी क्षेत्रातील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काश्मिरातील एकंदर व्यापाराची स्थिती गंभीर आहे, असे हुसेन यांनी सांगितले. काश्मिरात बाजार लवकर सुरू होत असले, तरी विशेष दर्जा हटवण्याच्या विरोधातील अघोषित आंदोलनाचा भाग म्हणून दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत पुन्हा बंद केली जात आहेत.

Leave a Comment