भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करा; संजय राऊतांचा राज ठाकरे यांना सल्ला

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज ठाकरे अन उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांना आता अधिक वेग आला आहे. यावर शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज ( 21 एप्रिल ) स्पष्ट भूमिका मांडली. “भूतकाळ विसरून महाराष्ट्राच्या अन देशाच्या हितासाठी भविष्याचा विचार करा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याच्या संकेताने काही लोकांच्या पोटात मळमळ होत आहे. त्यांना शेतात आणि शाखेत जायची वेळ येईल, अशी भीती वाटते. पण आम्ही अशा प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करत आहोत.”

मनसेकडून शिवसेनेच्या भूतकाळावर टीका –

मनसेकडून शिवसेनेच्या भूतकाळावर टीका होत असताना, राऊत यांनी काँग्रेस अन राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीचा दाखला देत सांगितले, “काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना भूतकाळ विसरला. जेव्हा हितासाठी हातमिळवणी करायची असते, तेव्हा भूतकाळाकडे पाहण्याचं कारण नसतं.”

संजय राऊत काय म्हणाले –

राज ठाकरे अन उद्धव ठाकरे यांच्या संकेतांवर संजय राऊत म्हणाले, “केवळ संकेत दिल्यावर राज्यात इतकी चर्चा आणि प्रतिक्रिया उमटत आहेत, तर जर हे दोन नेते प्रत्यक्षात एकत्र आले, तर काय होईल याची कल्पना करा” संजय राऊत यांनी मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना फटकारले. ते म्हणाले, “राज ठाकरे अन उद्धव ठाकरे यांच्यामधील संवाद हे फक्त त्या दोघांपुरते मर्यादित आहे. इतरांनी त्यात उगाच बोट घालू नये.”

राजकीय हालचाली वाढल्या –

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवरून राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. शिवसेना उबाठाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, ‘महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे’, असा पुनरुच्चार करण्यात येत आहे.