Health Department Recruitment : आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती; पुढील आठवड्यात जाहिरात निघणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आरोग्य यंत्रणेवर आणि आरोग्य विभागात (Health Department Recruitment)  करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यामुळे आता सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात 11,903 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ही जाहिरात आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी असणार आहे.

कोणकोणती पदे भरली जाणार? (Health Department Recruitment)

समोर आलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडयात ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी जाहिरात निघेल. मुख्य म्हणजे, ही भरती प्रक्रिया एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. तसेच, 11,903 जागांमध्ये, गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या रिक्त जागांचा समावेश असेल. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्ष सेवक या पदांसाठी भरती करण्यात येईल. पुढील आठवड्यात या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इतर अधिक माहिती समजेल.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेचा (Health Department Recruitment) प्रश्न खोळंबलेला होता. त्यामुळे इतर उमेदवार देखील या भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच ठाण्यातील रुग्णालयात एकाच वेळी 18 जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतरच सरकारने तातडीने आरोग्य विभागात रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात कर्मचारी नसल्यामुळे सर्व भार र अधिकाऱ्यांवर पडत आहेत. यामुळे थेट रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. या कारणानेच आरोग्य विभागात 11,903 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

ठाण्यात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू- 

ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. रुग्णालयाची अपुरी क्षमता , कमी कर्मचारी, डॉक्टरांचा हलगर्जीपणा अशा कित्येक कारणांमुळे या रुग्णांना आपल्या जीव गमवावा लागला. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सर्व पातळीवर योग्यरीत्या चौकशी करण्यात यावी असे देखील आदेश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, अशी वेळ येईपर्यंत सरकार काय करत होते? तसेच, या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.