आज INDIA आघाडीची दिल्लीत महारॅली; ठाकरे- पवारांसह 26 पक्ष एकजूट दाखवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधकांच्या INDIA आघाडीकडून (INDIA Alliance) आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर सेव्ह डेमोक्रेसी रॅली’ (Save Democracy Rally) काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी ‘इंडिया’ आघाडीचे अनेक नेते, अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, एमके स्टालिन यांच्यासह कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांची भक्कम एकजूट दिसणार आहे.

रॅलीसंदर्भात माहिती देताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत म्हंटल की, पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते रॅलीला संबोधित करतील. ही रॅली कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नाही तर ‘लोकशाही वाचवण्यासाठी आहे. तसेच ही कोणा एका पक्षाची रॅली नसून जवळपास 27-28 पक्ष यात सहभागी झाले आहेत. विरोधकांची एकजूट दाखवण्यासाठी सेव्ह डेमोक्रेसी रॅली अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर विरोधी आघाडीची ही दुसरी मोठी रॅली असेल. विरोधकांना या रॅलीचा फायदा किती होतो ते निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच समजेल.

रॅलीपूर्वी दिल्ली पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे. तसेच DDU मार्ग आणि त्याच्या आसपास, जेथे विविध राजकीय पक्षांची कार्यालये आहेत त्याठिकाणी मोठ्या मेळाव्यास बंदी घातली आहे. वाहतूक पोलिसांनी कार्यक्रमापूर्वी एक एडवाइजरी जारी केली आहे , जी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत लागू असेल. या रॅलीसंदर्भात जारी करण्यात आलेल्या ट्रॅफिक ॲडव्हायझरीनुसार, बाराखंबा रोड, मिंटो रोड, जेएलएन मार्ग, डीडीयू मार्ग आणि दिल्ली गेट यांसारखे प्रमुख रस्ते आणि परिसरात वाहतूक बंद केली जाऊ शकते. ISBT, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळाकडे जाणाऱ्या लोकांनी पुरेसा वेळ ठेऊन त्यांच्या प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे.