IRCTC : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसह प्रवासाचा दर्जा वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रतीक्षा (वेटिंग) यादीतील तिकीटधारकांबाबत नवा नियम लागू केला आहे.
1 मे 2025 पासून, प्रतीक्षा यादीतील तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यांना फक्त अनारक्षित (जनरल) डब्यातूनच प्रवास करता येईल. हा बदल देशभरातील सर्व (IRCTC) रेल्वेगाड्यांमध्ये लागू राहील.
काय आहे नवा नियम? (IRCTC)
प्रतीक्षा यादीतील तिकिटधारकांना स्लीपर आणि एसी कोचमध्ये बसण्यास मनाई करण्यात आली आहे.
कन्फर्म तिकीट नसलेले प्रवासी जर आरक्षित डब्यात आढळले, तर टीटीई त्यांना जनरल डब्यात पाठवू शकतो किंवा दंड आकारू शकतो.
स्लीपर कोचमध्ये वेटिंग तिकिटासाठी २५० रुपये आणि एसी कोचमध्ये ४४० रुपये दंड आकारला जाईल.
IRCTC द्वारे ऑनलाइन बुक केलेले वेटिंग तिकीट जर कन्फर्म झाले नाही, तर ते आपोआप रद्द होते आणि त्या प्रवाशाने प्रवास करता येत नाही.
मात्र काउंटरवरून घेतलेली प्रतीक्षा तिकिटे अद्यापही अनेकजण आरक्षित डब्यांमध्ये वापरत होते. यावरच ही बंदी लागू करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाचा उद्देश काय आहे? (IRCTC)
उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी किरण यांनी सांगितले की, “हा निर्णय कन्फर्म तिकिटधारक प्रवाशांच्या सुविधेसाठी घेतला आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवासी आरक्षित कोचमध्ये जबरदस्तीने प्रवेश करत असल्याने गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण होत होती.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “वेटिंग तिकिटधारक आरक्षित प्रवाशांच्या जागांवर बसण्याचा प्रयत्न करतात, जे नियमबाह्य आहे. त्यामुळे कोचमध्ये वाहतुकीचा मार्गही अडतो आणि संपूर्ण कोचमध्ये असुविधा निर्माण होते.”
प्रवाशांसाठी सूचना (IRCTC)
- जे प्रवासी स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करू इच्छितात, त्यांनी प्रवासाच्या आधी त्यांचे तिकीट कन्फर्म करून घ्यावे.
- प्रतीक्षा तिकीटधारकांनी जनरल डब्यांचा पर्याय स्वीकारावा.
- जनरल कोचमध्ये प्रवासासाठी आरक्षणाची गरज नसते, त्यामुळे हा कोच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
नियम मोडणाऱ्यांना शिक्षा निश्चित
जर कोणी प्रवासी या नव्या नियमाचे उल्लंघन करताना सापडला, तर रेल्वे कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होणार आहे. प्रवाशांनी यापुढे आपल्या प्रवासासाठी योग्य आणि वैध तिकीट बाळगणे अनिवार्य आहे.