हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना देखील आजही पोस्ट ऑफिसच्या योजनाच सुरक्षित आणि आकर्षक परताव्यासाठी लोकप्रिय ठरतात. सध्या पोस्ट ऑफिसच्या योजनांमधील (Post Office Scheme) ‘किसान विकास पत्र’ (Kisan Vikas Patr) ही योजना गुंतवणूकदारांना अधिक आकर्षित करत आहे. चांगला परतावा आणि सुरक्षितेचे गॅरंटी मिळत असल्यामुळे या योजनेत अधिक गुंतवणूक केली जात आहे.
किसान विकास पत्र योजनेत सध्या 7.5 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेली रक्कम 115 महिन्यांत म्हणजेच 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होते. याचा अर्थ जर एखाद्याने 5 लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर त्याला 10 लाख रुपये मिळतील. तसेच, 10 लाख गुंतवणूकदाराने जमा केल्यास त्याला 20 लाख रुपये दिले जातील
किमान गुंतवणूक फक्त 1,000 रुपये
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान 1,000 रुपये लागतात. तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या आर्थिक क्षमतेनुसार जास्तीत जास्त रक्कम या योजनेत गुंतवू शकतात आणि चांगला परतावा मिळवू शकतात.
KVP योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. ज्या गुंतवणूकदारांना जोखीम न घेता हमीशीर परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी KVP हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय, ज्या पालकांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निधी जमा करायचा आहे किंवा ज्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता हवी आहे, ते लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
गुंतवणुकीची प्रक्रिया
किसान विकास पत्र योजना कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुरू करता येऊ शकते. यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्डसारखी आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना एक सुरक्षित, हमीशीर योजना आहे. त्यामुळे गुंतवणूकदार विश्वासाने या योजनेत गुंतवणूक करू शकतात.