ठाणे प्रतिनिधी । कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये असलेल्या गाळ्यांच्या शेडवर आज अचानक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ६१ शेड पाडण्यात आले. त्यामुळे गाळेधारक चांगलेच संतापले आहेत. या कारवाईला या गाळेधारकांनी विरोधही केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. ज्या गाळाधारकांच्या विरोधात ही कारवाई केली गेली आहे त्यांनी आता एपीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत.
आमची परवानगी नसताना खोट्या सह्या घेऊन बाजार समितीने ही कारवाई केली आहे असं म्हणत कारवाई दरम्यान गाळेधारकांनी गोंधळ घालत कारवाईस विरोध केला. तर दुसरीकडे बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी गाळेधारकांचा आरोप फेटाळून लावला आहे.झालेली कारवाई ही नियमाला धरून केली गेली आहे. त्यामुळं गाळेधारकांच्या आरोपात काही तथ्य नाही असे थळे यांनी म्हटलं आहे.