यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 मुंबई । अबालवृद्धांचा लाडका सण अर्थात गणेशोत्सव जवळ येतो आहे. महाराष्ट्रात या उत्सवाचे महत्व विशेष आहे. यावर्षी मात्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे सर्वानी ठरविले आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहता प्रशासनाने देखील साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यंदा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळाना केले आहे.आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकित त्यांनी हे आवाहन केले आहे.  तसेच यावर्षी गणेशोत्सवात मिरवणुका नसतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही त्यामुळे गर्दी करता येणार नाही. मिरवणूका काढता येणार नाहीत. वाढत्या संसर्गाचा विचार करून सर्व प्रकारची दक्षता , योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. आणि हे आपणा सर्वाना पाळावेच लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत हळूहळू अर्थव्यवस्थेची घडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. म्ह्णून प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकले पाहिजे जे आपण करत आहोत. हा उत्सव देखील साजरा करताना आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी  आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू.’

पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. शिर्डी सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Leave a Comment