राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
काल सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व घटक, सर्व विभागांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प असून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री देसाई यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे.

शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प राज्याला सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर करेल, असे मंत्री देसाई यांनी म्हटले.

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानमंडळात राज्याचा 2023-24 या वर्षाचा 5 लाख 47 हजार 450 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. काल सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा 4 लाख 49 हजार 522 कोटी तर महसूली खर्च 4 लाख 65 हजार 645 कोटी आहे. महसूली तूट 16 हजार 112 कोटी तर राजकोषीय तूट 95 हजार पाचशे कोटी 80 लाख रुपये इतकी आहे.