हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mobile Recharge Price Hike : नवी वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चाप लावणारी एक बातमी समोर येत आहे. देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या, जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. हि वाढ जवळपास २० टक्के इतकी असू शकते. म्हणजे जर तुम्ही २०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुम्हाला आता २४० रुपये मोजावे लागतील. या निर्णयामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला आणखी मोठा झटका बसू शकतो.
मोबाईल रिचार्जच्या किमतीत होणारी वाढ (Mobile Recharge Price Hike) हे नियमित टॅरिफ सुधारणांचा एक भाग असेल. यामुळे टेलिकॉम उद्योगाच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे. फायनान्शियल सर्व्हिसेसमधील प्रसिद्ध कंपनी मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्या २०२६ मध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ४G/५G दोन्ही प्लॅनवर १६-२०% दर वाढवू शकतात. यामुळे २०२७ च्या आर्थिक वर्षात कंपन्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) देखील वाढेल. त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, कंपन्या स्वस्त प्लॅन काढून टाकत आहेत आणि अधिक महागड्या प्लॅनमध्ये OTT सारखे फायदे ग्राहकांना ऑफर करत आहेत. यामुळे ग्राहकांना महागडे प्लॅन निवडण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यांचे जास्तीचे पैसे खर्च होतात.
यापूर्वी कधी आणि किती रिचार्ज महागला ? Mobile Recharge Price Hike
आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये, मोबाईल रिचार्जच्या किमती १५% ते ५०% पर्यंत वाढवल्या गेल्या. २०२१ मध्ये, याच किमती किमती २०% ते २५% पर्यंत वाढल्या. गेल्या वर्षी, २०२४ मध्ये, रिचार्जच्या किमती आणखी १०% ते २०% पर्यंत वाढवण्यात आल्या होत्या. २०२५ मध्ये मोबाईल रिचार्जच्या किमती वाढल्या नाहीत परंतु आता २०२६ मध्ये रिचार्ज आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. एप्रिल ते जून 2026 दरम्यान हि दरवाढ होऊ शकते.
एअरटेलला जास्त फायदा ?
या नवीन दरवाढीचा सर्वाधिक फायदा हा एअरटेल ला होईल असं बोललं जात आहे. मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या अहवालानुसार, जेव्हा पूर्वी टॅरिफ वाढवले गेले होते, तेव्हा इतर कंपन्यांच्या तुलनेत एअरटेलचा महसूलात जास्त वाढ झाली होती. यावेळीही एअरटेललाच जास्त फायदा होईल अशी शक्यता आहे.




