आईचा सर्वोत्तम पुत्र म्हणजे ‘छ. शिवाजी महाराज’ : प्रा. विनोद बाबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तुमच्या कतृर्त्वाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि बापाची छाती अभिमानाने फुलेल हेच सर्वात मोठे यश आहे. आजकाल आपले आदर्श चुकीचे बनले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले खरे आदर्श आहेत. एका आईचा सर्वोत्तम पूत्र होणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जीवन जगणे होय, असे मत प्रेरणादायी व्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी व्यक्त केले.

तांबवे, (ता. कराड) येथे स्व. सै. सुशीला ज्ञानदेव पाटील सामाजिक बहुद्देशीय संस्थेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजक बाबूराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रदीप पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सौ. नयना पाटील- खबाले, सविता पाटील, सौ. स्वाती शिंदे, महेश पाटील, अक्काताई वीर, श्रीमान पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिक स्व. लक्ष्मण पावसकर यांच्या पत्नी रजनी पावसकर यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा. बाबर म्हणाले, मोबाईलच्या अतिवेडेपणामुळे युवा वर्गाचे जगणे, मरणे मोबाईल ठरवू लागला आहे. आमचे आदर्श चुकीचे ठरत आहेत. सोशल मीडियावर जे दिसते ते आमचे आदर्श असता कामा नयेत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे हे इतिहास निर्माण करणारी ही माणसे आहेत. त्यांचा आदर्श हवा. यांचा इतिहास मुलांमध्ये रुजवला तरच ते घडतील. जिजाऊंच्या आयुष्याचे सार्थक आणि छत्रपती शहाजीराजेंच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराज होणे म्हणजे त्यांच्यासारखे किल्ले जिंकण्याची गरज नाही तर आईचा सर्वोत्तम पुत्र बनणे म्हणजे छ. शिवाजी महाराज होणे होय. वतनदाराचा मुलगा ते स्वराज असा इतिहास अवघ्या ३५ वर्षात उभा केला. तोच आदर्श समोर ठेवून आम्हाला जगले पाहिजे. नयना खबाले यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामाची माहिती दिली. सुधीर नलवडे, अनिल काटवटे यांनी मनोगत व्यक्त केले. चिमुकली अधिरा चव्हाण हिने स्वातंत्र्य दिनावर भाषण केले. सौ. अंकिता कदम यांनी सूत्रसंचालन केले. विकास खडंग यांनी आभार मानले.