नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबेंचा गेम होणार? महाविकास आघाडीची मोठी खेळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने अडचणीत आलेल्या महाविकास आघाडीने नवी खेळी खेळली आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाकडून त्या उमेदवार असतील. परंतु एबी फॉर्म न नसल्याने शुभांगी पाटील अपक्ष निवडणूक लढवतील आणि ठाकरे गट आणि महाविकास आघाडी त्याठिकाणी त्यांना पाठिंबा देईल.

नाशिक पदवीधर मतदार संघात निर्माण झालेल्या ट्विस्ट नंतर मातोश्रीवर आज ठाकरे गटाची तातडीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, सुभाष देसाई. तसेच नाशिकमधील विजय काळसकर आणि विलास शिंदे हे पदाधिकारीही उपस्थित आहेत. त्यांनतर पदवीधर मतदार संघासाठी उभ्या राहिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यासुद्धा मातोश्रीवर दाखल झाल्या. तब्बल 3 तासांच्या मॅरेथॉन बैठकींनंतर ठाकरे गटाने शुभांगी पाटील याना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच घेतली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने शुभांगी पाटील याना पाठिंबा दिल्यानंतर सत्यजित तांबे नेमकी काय भूमिका घेणार? भाजपचा पाठिंबा मागणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु तांबेना शह देण्यासाठी महाविकास आघाडीने केलेल्या खेळीमुळे नाशिकमधील येत्या काही दिवसात अनेक घडामोडी दिसतील.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी पाठिंबा मिळाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आभार मानले तसेच ‘राजा का बेटा राजा नही बनेगा जो काबिल है वही राजा बनेगा’, असं म्हणत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत.

कोण आहेत शुभांगी पाटील-

शुभांगी पाटील या धुळे येथील भास्कराचार्य संशोधन संस्थेत त्या शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक आणि राज्याच्या अध्यक्ष आहेत. शुभांगी पाटील महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापकदेखील आहेत. याशिवाय त्या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.