रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत मिठाचा खडा; उदय सामंतांच्या दाव्यानंतर राणे आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र तिन्ही पक्ष एकत्र असल्याने आणि महाराष्ट्रात प्रथमच अशी अनोखी युती झाल्याने अनेक जागांवरून महायुतीत तेढ निर्माण होत आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) ही जागा शिवसेनेची असून शिवसेनेने लढावी अशी इच्छा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करत ही जागा भाजपचीच आहे असं म्हंटल आहे. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीतच तिढा निर्माण झाला आहे.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले –

रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेने लढली आहे. त्यामुळे ती जागा आताही शिवसेनाच लढेल. शिवसेनेने जागा लढवावी, अशी माझी इच्छा आहे. पण निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वासही उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला होता.

नारायण राणे यांचे ट्विट –

उदय सामंत यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनीही आक्रमक भूमिका घेत या मतदारसंघावर हक्क दाखवला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्वीट करत उदय सामंतांचा दावा खोडून काढला. त्यांनी म्हंटल, लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.” राणे यांच्या ट्विटमुळे कोकणातील या अतिशय महत्वाचा असलेल्या लोकसभा मतदार संघावरून महायुतीत मिठाचा खडा पडताना दिसत आहे.