Navratri Special : देवी संप्रदायाचा उगम व प्रसार कसा झाला माहिती आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Navratri 2023 । भारतात देवतोपासनेस अनुलक्षून जे पंथ वा संप्रदाय निर्माण झाले, त्यांत देवी वा शक्तिपूजक किंवा मातृदेवतापूजक संप्रदाय हा फार प्राचीन व सर्वव्यापी आहे. देवताशास्त्रात पंचदेवोपासनेस प्रमुख स्थान आहे. निर्गुण वा निराकार परतत्त्वाचे सगुण वा साकार प्रतीक कल्पून त्याची भक्ती करणे व अनुग्रहाच्या अपेक्षेने संपूर्ण जीवन त्याच्या पूजन–कीर्तनांत व्यतीत करणे, ही पद्धती भारतीय भक्तिमार्गाची विशेषता आहे. भक्तिमार्गात अनेक देवता आहेत पण विष्णू, शिव, सूर्य, गणपती आणि देवी यांची पूजा व भक्ती व्यापक प्रमाणात होत असते. देवता व त्यांची शक्ती यांचा हळूहळू विकास होत गेला व त्या विकासक्रमामध्ये शक्तीला देवत्व प्राप्त झाले. या शक्तीलाच तिच्या अनन्यसाधारण तेजामुळे ‘देवी’ हे अमिधान प्राप्त झाले. अर्थात देवत्वातील पुरुषतत्त्वाच्या आणि स्त्रीतत्त्वाच्या भिन्नत्वाची सीमारेषा फारच अंधुक आहे.

‘दीव्यति इति देवी’ अशी देवी शब्दाची व्युत्पत्ती सांगता येईल. ‘खेळणे’ असाही ‘दिव्’ धातूचा अर्थ आहे. त्या प्रमाणे अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सृष्टि–स्थिति–लयरूपाची क्रीडा देवी करीत असते, असा अर्थ होईल. इतर देवांप्रमाणे परात्परशक्तीनेही भूतांच्या पालनासाठी व दुष्टांच्या निर्दालनासाठी निरनिराळे ‘अंशावतार’ धारण केले. धर्माचे शत्रू असणाऱ्या अनेक राक्षसनेत्यांचा नाश करून देवीने देवांचे आणि स्वभक्तांचे रक्षण केले, असे समजण्यात येते. तिचे अवतार प्रसंगानुसार सात्त्विक, राजंस किंवा तामस स्वरूपाचे आहेत. त्याप्रमाणे तिची लौकिक नावेही भिन्न भिन्न आढळतात. ‘दुर्ग’ नावाच्या राक्षसास मारल्यामुळे ती दुर्गा झाली. ‘महिषासुरास’ मारून ती ‘महिषासुरमर्दिनी’ झाली. चंड–मुंडांचा वध केल्यानंतर तिला ‘चांमुंडा’ हे नाव प्राप्त झाले. या राक्षसवधकथा मुख्यत्वेकरून ‘सप्तशती’, देवीभागवत, ब्रह्मांडपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण या पुराणग्रंथांत व अनेक तंत्रग्रंथांत आल्या आहेत. देवीचे कार्यस्वरूप सामूहिक तेजाचे आहे. मूळ देवीचा वास ‘मणिद्वीपा’त आहे, तेथे ती पाच देवतांच्या सिंहासनावर (पंचप्रेतासन) विराजमान झाली आहे, या भुवनेश्वरीनेच स्वतःच्या काही अंश–शक्ती तीन प्रमुख देवांना दिल्या, असे देवीभागवतात सांगितले आहे.

महासरस्वतीत सत्त्वाचे, महालक्ष्मीत रजस्‌चे व महाकालीत तमस्‌चे प्राबल्य असते. त्यामुळे देवीच्या मूर्तीतही फरक झालेला आहे. संप्रदायानुसार सरस्वती हंसवाहनयुक्त, श्वेतवस्त्र धारण करणारी व वीणापुस्तकधारिणी आहे. महालक्ष्मी कमलासना, शंखचक्रगदा धारण करणारी आहे. महाकाली श्मशानवासिनी, नरमुंडमाला धारण करणारी, हातात खड्‌गशूल घेतलेली व क्रूर आहे. त्रिगुणांच्या सापेक्ष आविर्भावामुळे जगातील सर्व वस्तूंत देवी साररूपाने वास करीत असते. ‘सप्तशती’ मध्ये तीन देवतांची ध्याने दिली आहेत. साधारणपणे देवीच्या मूर्ती भारतात याच स्वरूपाच्या घडविल्या गेल्या आहेत.

पुराणांच्या परिशीलनावरून देवीउपासनेचे दोन संप्रदाय स्पष्टपणे दिसून येतात: वैदिक व तांत्रिक. वैदिक संप्रदायाची उपासना ही दोन स्वरूपांची आहे: बाह्य व आंतर. बाह्य उपासना म्हणजे स्नान, गंध, पुष्प इ. उपचार करून पूजा आंतर म्हणजे मानसिक पूजा, ध्यान व जप. बाह्य उपासनेत सर्वांत महत्त्वाचा भाग नवरात्रासारखा व्रतांचा आहे. वैदिक आंतर उपासनेत गायत्री–उपासना आहे. गायत्रीमंत्राचे पुरश्र्चरण, जपपद्धती इ. विषय यामध्ये येतात. या सर्व उपासनांचे स्वरूप सौम्य आहे पण बाह्य उपचारांत पशुवधाचे विधानही काही ग्रंथांत आढळते.

देवीच्या राजसी किंवा तामसीपूजेता प्रकार भारताच्या ग्रामीण भागात अधिक दिसून येतो. खेडेगावांत ज्या ‘ग्रामदेवता’ असतात, त्या देवीचेच अंश आहेत. दुष्काळ, रोगराई इ. संकटांचे निवारण करण्यासाठी या ग्रामदेवातांची पूजा होत असते. ग्रामदेवता नवसास पावतात, असाही खेडेगावांतील लोकांचा विश्वास असतो. विशिष्ट दिवशी तेथे जत्रा भरते व त्यावेळी भूत–पिशाचादींचा आवेश, अंगात येणे इ. प्रकार होतात. पशुबलीही दिला जातो. भवानी, यमाई, अंबाबाई, जाखाई, डाकिनी, हाकिनी इ. देवीचे अंश महाराष्ट्रात पूजिंले जातात. पुष्काळ वेळा अनाचाराचाही त्यात प्रवेश होतो. पूर्वोत्तर भारतात ‘मनसा’ किंवा सर्पदेवता, षष्ठी, मंगलचंडी, शीतला (‘देवी’ रोगाची देवता), ओइलचंडी (पटकीची देवता), काली यांची पूजा सर्वत्र होत असते.

दक्षिण भारतात काली, मरियम्मा आणि पोचम्मा या देवतांची पूजा करतात. पुजारी साधारणपणे ब्राह्मणेतर वर्गातील असतात. पशुबलीचाही प्रकार आहे. अनेक विद्वान पशुबलीची संबंध सुफलताविधीशी जोडतात. केरळमध्ये ‘भगवती’ ची पूजा करतात. नऊ समकेंद्र वर्तुळांचे किंवा योनींचे चित्र काढले जाते. त्याला श्रीचक्र असेही म्हणतात. श्रीचक्राच्या पूजकांस ‘श्रीविद्योपासक’ असे म्हणतात. तमिळनाडूमध्ये कांचीची कामाक्षी व मदुरेची मीनाक्षी यांची देवळे वास्तुशिल्पाच्या द्दष्टीने अप्रतिम आहेत. अशा रीतीने संपूर्ण भारतात देवीच्या अनेक रूपांची पूजा अनेक पद्धतींनी होत असते. देवीपूजेत बराच अवैदिक भाग आहे पण तो मूळचा असला पाहिजे. सध्याच्या पूजापद्धतीत वैदिक तत्त्वांचा आणि तांत्रिक उपासनेचा सुंदर संगम दिसून येतो.

लेखक- प्रतीक पुरी
(माहिती संदर्भः मराठी विश्वकोश)