मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नाही; नितीशकुमारांचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) आज नवा भूकंप घडण्याची शक्यता असून मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी सरकार आहे मात्र नितीशकुमार राजीनामा देऊन भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. नितीशकुमार दुपारी भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करतील. मात्र एकेकाळी याच नितीशकुमारांनी दावा केला होता कि एकवेळ मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नाही. त्यांचा हा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नितीश कुमार एनडीएत जाण्याच्या चर्चांवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नितीश कुमार यांना प्रश्न विचारला होता. तेव्हा नितीश कुमार म्हणाले होते, मला मरण मान्य आहे परंतु, NDA बरोबर जाणं मान्य नाही, ही गोष्ट हे सर्वांना चांगलीच माहिती आहे. आम्ही हा सगळा खाटाटोप का केला असेल? इतकी हिंमत करून, मेहनत करून आम्ही सत्ता स्थापन केली. लोकांनी आम्हाला मत देऊन सत्तेत बसवलं आहे. NDA ची लोक सत्तेत येण्यासाठी काहीही करू शकतात असं या व्हिडिओत नितीशकुमार बोलत आहेत. हा विडिओ तुफान व्हायरल होत आहे.

समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजीव राय यांनी ट्विटर वर हा नितीशकुमार यांचा हा विडिओ शेअर करत निशाणा साधला आहे. माननीय नितीशकुमारजी होय, तुम्ही दीर्घायुष्य जगावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे, तुम्ही देशाचे महान नेते आहात. आम्हा सर्वांना तुमच्याकडून आशा आहे की, तुम्ही भाजपच्या विरोधात जी शपथ घेतली होती ती आम्ही एकत्र पूर्ण करू.तुम्ही इंडिया आघाडीचे जनक आहात, तुम्ही परत फिरलात तर जनता काय विचार करेल? असा सवाल राजीव राय यांनी केला आहे.

दरम्यान, नितीशकुमार हे सातत्याने आपली राजकीय भूमिका बदलत असतात. कधी ते एनडीए सोबत जातात तर कधी लालू प्रसाद यादव यांचा हात हातात धरतात, म्हणून काही जण त्यांना पलटुसम्राट असेही म्हणतात. नितीशकुमार यांनी यापूर्वी भाजपसोबत सत्तास्थापन केली होती, त्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये आरजेडी सोबत हातमिळवणी करत भाजपचे सरकार पाडलं. आता पुन्हा एकदा त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर NDA मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे बिहारच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे.