कोल्हापूरला यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड-चांदोली मार्गावर येणपे- लोहारवाडी येथे आज सकाळी रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघातात रिक्षा चालक, त्याची पत्नी, मुलगी यांचा समावेश असून मुलगा गंभीररीत्या जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पनुंद्रे येथील सुरेश सखाराम महारुगडे (वय 39), सु्वर्णा सुरेश महारुगडे (34), समिक्षा सुरेश महारुगडे (13), समर्थ सुरेश महारुगडे (17) हे पुण्याहून कोल्हापूरला रिक्षाने यात्रेसाठी निघाले होते. त्यांची रिक्षा सकाळी दहाच्या सुमारास येणपे गावाजवळील लोहारवाडी परिसरात आल्यावर रिक्षा आणि कऱ्हाडच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टरची धडक झाली. त्यामध्ये रिक्षाचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. रिक्षावर ट्रॅक्टर आल्याने आतमध्ये बसलेले रिक्षातील सर्वजण आकडले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतळी. रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढले.

यानंतर स्थानिकांनी या अपघाताची माहिती कराड तालुका पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अली मुल्ला, हवालदार प्रकाश कारळे, पी. ए. एक्के, बी. बी. राजे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात आई-वडिलांसह एक मुलगी ठार झाली असून मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.